नोकरीनिमित्त 1974-1975 साली औरंगाबादला होतो. सकाळी-संध्याकाळी गुलमंडी, पैठण गेट, वगैरे परिसरात फिरायचो. शनिवारी-रविवारी दुपारच्या वेळी रस्त्याच्या कडेला सदरा-पायजमा वेषात हातात कानकोरणी घेऊन उकिडवे बसलेले तरुण दिसत. हे तरुण गोड बोलण्यात अतिशय पटाईत असत. जवळून जाणाऱया पादचाऱयांना हाकारे घालून खाली बसायला लावत आणि ‘माफक दरात’ कान साफ करून देण्याचा प्रस्ताव मांडीत. त्यांच्या बोलण्याला भुरळलेले गिऱहाईक समोर बसत असे. हातातल्या कानकोरण्याने गिऱहाइकाच्या कानात गुदगुल्या केल्यावर तो तरुण हातचलाखीने हातात बारीक खडे किंवा चिकट मातीचे गोळे काढून त्याला दाखवून म्हणे, ‘देखो, तुम्हारे कानसे ये कंकड निकला.’ गिऱहाईक छानपैकी खुश होऊन पैसे देई आणि उठून जाई. हे आठवण्याचे कारण हल्ली संगणकावर काम करताना येणारा मजेदार अनुभव… संगणकावर आंतरजालाची सेवा वापरताना कधी कधी व्हायरसची लागण होण्याचा धोका असतो. त्यातून संगणकातील सर्व माहिती नष्ट होऊ शकते. म्हणून लोक अँटी-व्हायरस नावाचे प्रकरण घेतात. त्यासाठी त्या कंपनीला दरवषी ठरावीक शुल्क द्यावे लागते. अँटी-व्हायरस बनवणाऱया अनेक कंपन्या आहेत. गिऱहाईक मिळावे म्हणून त्यांच्यात चुरस असणारच. त्यामुळे कराराचे वर्ष संपत आले की कंपनीकडून मजेदार मेसेजेस येऊ लागतात. ‘तुमच्या संगणकात अमुक नावाचा धोकेबाज व्हायरस शिरत होता. आम्ही त्याचा निःपात केला आहे. आमच्यामुळे तुमचा संगणक सुरक्षित आहे. वगैरे.’ खरे सांगायचे असते ते हे की ‘वर्ष संपल्यावर कराराचे नूतनीकरण आमच्याकडेच करा, पैसे द्या.’ कानकोरण्याने काढलेला कानातला खडा आणि कंपनीने ठार केलेला व्हायरस यातले खरे किती आणि खोटे किती हे त्यांनाच ठाऊक. पण तिसरा प्रकार अधिक अफलातून आहे. निवडणुका आल्या की विविध पुढारी येतात आणि टोलमुक्त राज्य, भ्रष्टाचार मुक्त देश, अमुक मुक्त विश्व वगैरे आश्वासने देतात. आपण एकदा मत देऊन रिक्त झालो की आपल्यापासून ते मुक्त होतात. आपल्याला विसरून जातात. टोल चालू राहतात. भ्रष्टाचार चालू राहतो. आयुष्य नावाचा संगणक बंद पडत नाही, इतकेच. त्याने सगळे व्हायरस सगळे कानातले खडे पचवलेले असतात. पुढाऱयांच्या लीला पाहिल्या की अँटी-व्हायरस विकणाऱया कंपन्या साध्याभोळय़ा वाटू लागतात. पाच दशके आधी औरंगाबादच्या रस्त्यावर पाहिलेले कानकोरणी धारक तरुण काहीच्या काही शामळू वाटतात. पण कोण जाणे, त्यातले कोणी कोणी कानकोरणी फेकून देऊन राजकारणात शिरले असतील आणि यशस्वी देखील झाले असतील.
Previous Articleदीर्घसूत्री म्हणजे चेंगट माणसाचा नाश होतो
Next Article जूनमध्ये 16,662 कंपन्यांची नोंदणी
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.