माजी विद्यार्थी-शिक्षकांची मोठय़ा प्रमाणात उपस्थिती : भूतकाळातील आठवणींना मिळाला उजाळा : माजी विद्यार्थ्यांनी मानले ऋण
वार्ताहर /नंदगड
प्रत्येक जण आपल्या नोकरी-व्यवसायात गुंतलेला. संसार चालविण्याची चाललेली धडपड. हे सर्व नित्यनेमाने सुरू असतानाच ‘एक दिवस शाळेसाठी’ या निमित्ताने कापोली हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा नुकताच उत्साहात पार पडला.
शेकडो विद्यार्थ्यांनी उपस्थिती दर्शवून आपल्या शालेय जीवनातील कडू-गोड आठवणींना उजाळा दिला. आपलेपणा आणि आदरातिथ्य सर्वत्र दिसून येत होते. सर्वांच्या सहवासात केव्हा एकदाचा दिवस गेला, हे कुणालाच कळले नाही. कापोली हायस्कूललगत असलेल्या माऊली मंदिर सभागृहात भव्यदिव्य असा हा कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी मराठा मंडळ कापोली हायस्कूलचे मुख्याध्यापक एस. बी. घुग्रेटकर होते.
प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ट नागरिक संभाजी देसाई, मनोहर देसाई, ग्राम पंचायत माजी अध्यक्ष संजय देसाई, निवृत्त प्राचार्य रमेश देसाई, उद्योजक रामू गुंडप, सुवर्णपदक विजेता प्रकाश पेडणेकर आदी उपस्थित होते.
हायस्कूलचे मुख्याध्यापक एस. बी. घुग्रेटकर यांनी सर्वप्रथम माजी विद्यार्थ्यांनी शाळेच्या आवारात थ्रीडी सौरमंडळ रंगकाम, प्रत्येक वर्गात प्रोजेक्टर, फॅन, विद्युत व्यवस्था यांची तसेच संपूर्ण शाळेचे डिजिटलायझेशन केल्याचा आढावा उपस्थित सर्वांसमोर मांडला. माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्यातून पुस्तक न घेता व्हिज्युअल व ऑनलाईन शिक्षण सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांना त्यांनी धन्यवाद दिले. दुर्गम भागातील या मराठी माध्यमाच्या शाळेसाठी माजी विद्यार्थ्यांनी केलेल्या कार्याचा त्यांनी आपल्या भाषणात गौरव केला. आगामी काळात सहा सीसीटीव्ही कॅमेरे, सोलार पॅनेल सिस्टीम व शाळेच्या आवारात ‘ओपन लायब्ररी’ सुरू करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. गेल्या तीस वर्षात या शाळेबद्दल व गावाबद्दल आपल्याला लागलेल्या लळय़ाने त्यांनी आपल्याला पुनर्जन्म मनुष्याचाच मिळावा व शिकून याच शाळेत शिक्षक म्हणून काम करायला मिळावे व या शाळेत शिकून गेलेलेच विद्यार्थी मला पुन्हा मिळावेत, अस्शी अपेक्षा व्यक्त केली.
ज्ये÷ नागरिक संभाजी देसाई यावेळी बोलताना म्हणाले, 1983 साली या हायस्कूलची सुरुवात झाली. त्यामुळे कापोली व परिसरातील अनेक विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय झाली. परंतु अलीकडे काम-धंद्यानिमित्त या भागातील अनेकजण परगावी राहत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची संख्याही रोडावली आहे. त्यातच इंग्रजीचे फॅड निर्माण झाल्याने मराठी माध्यमाच्या शाळांना विद्यार्थी कमी मिळत असल्याची खंत व्यक्त केली. मराठी भाषा, संस्कृती टिकविण्यासाठी व मराठी भाषेचा अभिमान जतन करण्यासाठी सर्वांनी आपल्या मुलांना मराठी शाळेतच पाठवावे, असे आवाहन केले.
यावेळी आर. जी. देसाई म्हणाले, आपण ज्या क्षेत्रात असाल त्याच क्षेत्राला कमी न लेखता मन लावून काम केल्यास त्यात आपण निश्चितच यशस्वी होतो. माणूस जन्माला गरिबीत येतो, हे त्याच्या हातात नसते. परंतु उच्च ध्येय बाळगून तिथपर्यंत पोचणे आपल्या हातात आहे. हे साध्य करण्यासाठी शरीररुपी यंत्राचा चांगला उपयोग करून ध्येय गाठावे.
माजी विद्यार्थी परशराम पेडणेकर यांनी शाळेबद्दल आपला अनुभव व्यक्त करून आजच्या विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरातून उच्च ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करावा याबाबतचे मार्गदर्शन केले.
माजी विद्यार्थी शिवराम मिराशी यांनी आपण गरिबीचे चटके सोसत नोकरी मिळविण्यासाठी केलेल्या संघर्षाचा सविस्तर वृत्तांत सादर केला. जीवनात आपण काय गमावले याबाबत खंत व्यक्त न करता आपले कार्य सदोदित कार्यरत ठेवावे, असा सल्ला दिला.
यावेळी माजी विद्यार्थी विकास देसाई, या शाळेत काम केलेले शिक्षक दिलीप सावंत, शिक्षिका वाली आदींनीही आपले मनोगत व्यक्त केले. उद्योजक रामू गुंडप यांनी शाळेसाठी तीन डायस दिले. यावेळी आजी-माजी मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा माजी विद्यार्थ्यांनी यथोचित सत्कार केला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत शिक्षक शाहू नांगनूरकर यांनी केले. सूत्रसंचालन ज्ये÷ शिक्षक संजीव वाटूपकर यांनी तर आभार संभाजी देवलतकर यांनी मानले.