359 कामगार संपावर, शहरवासियांची पाण्यासाठी भटकंती सुरू
प्रतिनिधी /बेळगाव
शहराला पाणीपुरवठा करणाऱया हंगामी कामगारांनी विविध मागण्यांचे निवेदन देऊन शासनाकडे पाठपुरावा केला होता. मात्र याबाबत शासनाकडून कोणताच निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे पाणीपुरवठा विभागाचे कामगार संपावर गेले आहेत. संप मागे घेण्यासाठी महापालिका आयुक्तांनी प्रयत्न केले, पण शुक्रवारी देखील कामगारांनी संप मागे घेतला नाही. त्यामुळे शहराच्या विविध भागामध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे.
शहराला पाणीपुरवठा करणाऱया हंगामी कामगारांनी महापालिका आयुक्तांना निवेदन देऊन 359 कामगारांना सेवेत कायम करण्याची मागणी केली होती. तसेच शासनाकडे पाठपुरावा करण्यात आला होता. या मागणीसाठी ऑक्टोबरमध्ये धरणे आंदोलन छेडण्यात आले होते. मात्र शहरवासियांना पाणी समस्येला तोंड द्यावे लागणार असल्याने शासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन देऊन आंदोलन मागे घेण्याची सूचना मनपा आयुक्तांनी केली होती. त्यामुळे कामगारांनी आंदोलन मागे घेतले होते. पण दोन महिन्यानंतरही याबाबत शासनाकडून कोणताच निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे सदर कामगार सोमवारपासून संपावर गेले आहेत. त्यामुळे शहरात पाणीसमस्या निर्माण झाली आहे. पाणी समस्या निवारणासाठी मनपा आयुक्तांनी कामगारांशी चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. पण मनपा आयुक्त रूदेश घाळी यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. त्यामुळे संपाचा तिढा ‘जैसे थे’ आहे. परिणामी शुक्रवारी देखील शहरात पाणी समस्या निर्माण झाली.
पाच दिवसांपासून पाणीपुरवठा खंडित झाल्याने विविध भागात पाणीटंचाई निर्माण झाल्याने शहरवासियांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. तसेच टँकरने पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. पाणीपुरवठा कामगारांनी मागणीबाबत ठोस आश्वासन मिळाले नसल्याने संप सुरूच ठेवला आहे. बिल कलेक्टर, व्हॉल्वमन, पंप ऑपरेटरसह 359 कामगार सध्या संपावर आहेत. याबाबत तोडगा निघाला नसल्याने शहरवासियांचे पाण्याअभावी हाल होत आहेत.