ऑनलाईन टीम / मुंबई :
कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे राज्यात सरकार लाॅकडाऊन लावेल की काय? अशी शंका लोकांच्या मनात होती. पण सरकारने सर्वांना काही प्रमाणात दिलासा देत राज्यात संपुर्ण लाॅकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला नाही. राज्य सरकारने राज्यात कडक लाॅकडाऊन ऐवजी कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला होता. त्याआधीपासून परप्रांतिय तसेच राज्यातील पुणे आणि मुंबई सारख्या शहरात राहणाऱ्या मजुरांनी स्थालांतर करण्यास सुरवात केली. त्यानंतर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी कामगारांना स्थलांतर न करण्याचे आवाहन केले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या काही ठिकाणी कामगारांचं स्थलांतर चालू आहे. कामगारांनी स्थलांतर करू नये तसेच कोणत्याही प्रकारच्या अफवांना बळी पडू नये. राज्य सरकार आणि प्रशासन मजुरांच्यासोबत आहे, अशी ग्वाही हसन मुश्रीफ यांनी दिली आहे.
पुढे ते म्हणाले, राज्यातील सर्व सार्वजनिक वाहतूक व्यवस्था म्हणजेच बस, रेल्वे आणि खाजगी वाहनांची वाहतूक व्यवस्था ही चालूच राहणार आहे. मात्र त्यांना देखील सरकारने आखलेल्या नियमांचे पालन करावे लागेल. प्रवास व्यवस्था चालूच राहणार असल्याने कोणतीही भिती बाळगू नये, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, कोणत्याही परिस्थितीत राज्यातील कारखाने तसेच उद्योग त्याचबरोबर कामगारांचे काम बंद होणार नाही याची काळजी सरकार घेत आहे. कामगारांनी उद्योगधंदे चालू राहण्यासाठी हातभार लावावा, असे आवाहन देखील हसन मुश्रीफ यांनी केलं आहे.
तसेच मोठ्या प्रमाणावर कोव्हिड रुग्णांची संख्या वाढत असली तरीही ती नियंत्रणात आणण्यासाठी राज्य शासनाकडून संपूर्ण प्रयत्न करण्यात येत आहे. राज्यात सर्व दवाखान्यांद्वारे अत्यावश्यक सेवा-सुविधा उपलबध करुन कोणत्याही परिस्थितीत कोव्हीड अथवा इतर रुग्णांच्या आरोग्यासंदर्भात अडचणी येणार नाहीत, असेही त्यांनी नमूद केले.