काम असूनही अडचणींमुळे उद्योगांची गती मंदावली
प्रतिनिधी / बेळगाव
अत्यावश्यक सेवा व साहित्याशी निगडीत उद्योग सुरू ठेवण्यास परवानगी दिल्यामुळे 50 टक्के उद्योग आठवडाभरापासून सुरू झाले. परंतु 50 टक्के कामगारांची ठेवण्यात आलेली अट तसेच कोरोना झाल्याने गैरहजर असणारे कुशल कामगार व कच्च्यामालाची अनुपलब्धता यामुळे जिल्हय़ातील उद्योग अडचणीत आले आहेत. काम असूनही या समस्यांमुळे उद्योगांची गती मंदावल्याचे चित्र आहे.
जिल्हा औद्योगिक केंद्राने (डीआयसी) अत्यावश्यक सेवांशी निगडीत उद्योगांना परवानगी दिली आहे. त्यामुळे औद्योगिक वसाहतीमधील 50 टक्के उद्योग सुरू करण्यात आले. कृषी, धान्य, अन्नपदार्थ, मेडिकल, एव्हिएशन, डिफेन्स, रेल्वे यांच्याशी निगडीत उत्पादन करणाऱया उद्योगांना परवानगी मिळाली आहे.
हार्डवेअर दुकाने सुरू करण्याची मागणी
औद्योगिक वसाहत सुरू करण्यात आली असली तरी उद्योगांना लागणाऱया साहित्याची दुकाने अद्याप बंद आहेत. विशेषतः हार्डवेअर, इलेक्ट्रिक साहित्याची आवश्यकता भासते. परंतु डीआयसीने त्यांना अद्याप परवानगी दिलेली नाही. त्यामुळे जोवर साहित्य उपलब्ध होत नाही तोवर काम थांबवावे लागत आहे. त्यामुळे औद्योगिक वसाहतींमधील दुकानांना तरी परवानगी देण्याची मागणी करण्यात येत आहे.
कच्च्यामालाच्या किमतीत वाढ
मुंबई, पुणे यासह देशातील महत्त्वाच्या शहरांमध्ये अद्यापही लॉकडाऊनची स्थिती आहे. यामुळे उद्योगांना कच्चामाल उपलब्ध करून घेण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यातच बाहेरून कच्चामाल घेऊन येणाऱया वाहनांना जाताना भाडे नसल्याने खाली जावे लागत आहे. त्यामुळे ट्रान्सपोर्टवाले येण्या-जाण्याचे भाडे आकारत असल्याने कच्च्यामालाच्या किमती वाढल्या
आहेत.