प्रतिनिधी/ पणजी
देशभरातील विविध कामगार संघटनांनी पुकारलेल्या देशव्यापी संपाला पाठिंबा दर्शवण्यासाठी गोव्यातील विविध कामगार युनियन्सनी पणजीत मोर्चा काढून जाहीर सभा घेतली आणि केंद्र तसेच राज्य सरकारच्या जनता व कामगार विरोधी धोरणांचा निषेध नोंदवला. सभेतून – मोर्चातून विविध मागण्या करण्यात आल्या तसेच कामगार विरोधी धोरणे मागे घेण्याचे आवाहन अनेक कामगार नेत्यांनी केले. तसे न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सभेतून देण्यात आला.
विविध कामगार संघटनांचे संयुक्त व्यासपीठ असलेल्या गोवा कनव्हेंशन ऑफ वर्कर्सतर्फे हा मोर्चा काढण्यात आला. पणजी बसस्थानकावरुन सुरु झालेला हा मोर्चा प्रमुख रस्त्यावरुन फिरल्यानंतर पणजीतील आझाद मैदानावर त्याचे जाहीर सबेत रुपांतर झाले. विविध नेत्यांनी तेथे सरकारच्या विरोधात जोरदार भाषणे केली. मोर्चात- तसेच सभेतून मोठय़ाने घोषणाबाजी करण्यात येत होती.
महागाई -भाववाढ यावर नियंत्रण आणावे, खाण उद्योग सुरु करण्यासाठी ‘गोवा खाण विकास महामंडळ’ स्थापन करावे, खाण कामगारांना भरपाई म्हणून प्रति महिना रु. 20,000 अनुदान द्यावे, रस्ते खड्डे बुजवून सुरळीत करावेत, किमान वेतनाची कार्यवाही व्हावी, कंत्राटी कामगार पद्धत रद्द करावी, भ्रष्टाचार नष्ट करावा, सर्वांना रु. 6000 निवृत्ती वेतन प्रति महिना द्यावे, बेकारांना नोकऱयांची सोय करावी, कोमुनिदाद जमीनी राखून ठेवाव्यात, म्हादईचे वळवलेले पाणी रोखावे आणि ते वळवू देऊ नये, अशा विविध मागण्या सभेत ठरावातून संमत करण्यात आल्या. ते मागण्याचे पत्रक केंद्र- राज्य सरकारला सादर करण्यात येणार आहे.
कामगार नेते ख्रिस्तोफर फोन्सेको, स्वाती केरकर, अजितसिंह राण्s, वाल्मिकी नाईक, सुहास नाईक, सुदिप ताम्हणकर इत्यादीची सभेत भाषणे झाली. कामगारांचे शोषण करणारी धोरणे मागे घेण्याची मागणी सभेतून झाली. आयटक, सिटू, विमा कर्मचारी युनियन, इंटक, बँक कर्मचारी संघटना मोर्चात-सभेत सहभागी झाल्या होत्या.
बंद चा गोव्यात परिणाम नाही
विविध कामगार संघटनांनी बुधवारी पुकारलेल्या देशव्यापी बंदचा गोवा राज्यातील दैनंदिन कामकाजावर कोणताही परिणाम जाणवला नाही. राज्यातील सर्व व्यवहार सुरळीत चालू होते. येथील कामगार संघटनांनी देखील विविध मागण्यांसाठी बंद चे आवाहन केले होते. तथापि त्यास जनतेने प्रतिसाद दिला नाही. शाळा महाविद्यालये बाजारपेठा व नित्याचे व्यवहार कुठेही खंड न पडता चालू होते. जनतेची गैरसोय होण्यासारखा कोणताही प्रकार घडला नाही. एकंदरीत हा बंद गोव्यात पूर्णपणे फसल्याचे स्पष्ट झाले.