सध्याच्या काळात प्रत्येकाला मानसिक ताणतणावांशी मोठय़ा प्रमाणात झुंजावे लागत आहे. प्रत्येक क्षेत्रात वाढती स्पर्धा, कामाचा प्रचंड ताण, मोठय़ा अपेक्षा इत्यादींमुळे मनोरूग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. कार्यालयांप्रमाणे घरातही अनेक जण तणावाशी दोन हात करीत आहेत. हा तणाव एका विशिष्ट मर्यादेपलिकडे पोहोचला, की त्याचा शरीरावरही विपरीत परिणाम होऊ लागतो.
अनेक तज्ञांनी या तणावाची कारणे स्पष्ट केली आहेत. सर्वात जास्त तणाव वर्कलोडमुळे येतो हे दिसून आले आहे. नेहमीच्या वेळेपेक्षा अधिक वेळ काम करणे, रात्रपाळय़ा कराव्या लागणे इत्यादींमुळे स्थिती अधिकच बिघडत आहे, असे मानसोपचार तज्ञांचे मत आहे. या तणावापासून मुक्ती मिळविण्यासाठी अनेकजण मद्यपानाकडे वळतात. मद्याची नशा असेपर्यंत तणाव जाणवत नाही. तथापि, नंतर तो अधिक प्रमाणात त्रास देऊ लागतो. त्यामुळे अधिक मद्यपान केले जाते. अखेरीस माणूस मद्याच्या आहारी जाऊन व्यसनाधीन होतो आणि त्याची कार्यक्षमता कमी होऊन त्याचे करिअर धोक्यात येते.
सध्याच्या कोरोना उद्रेकाच्या काळात अनेक जणांच्या नोकऱया गेल्या. हे तणावाचे नवे कारण निर्माण झाले. एकीकडे काहींना अधिक कामाचा ताण, तर दुसरीकडे काहींना काम गमावल्यामुळे ताण अशी स्थिती निर्माण झाल्यामुळे मोठाच सामाजिक असमतोल निर्माण झाला आहे. संयम बाळगणे आणि व्यसनांपासून दूर राहणे हाच यावर सर्वोत्तम उपाय आहे. तणावमुक्तीसाठी देवाची प्रार्थना, चांगल्या पुस्तकांचे वाचन, एकाद्या कलेची, किंवा सकारात्मक छंदाची जोपासना, भरपूर पाणी पिणे, सत्वयुक्त आहार आणि शक्य तितका सामाजिक संपर्क हे उपाय सुचविण्यात आले आहेत. ते करावयास सोपे आणि सहजसाध्य आहेत.