प्रतिनिधी / सांगली
जिह्यातील प्रलंबित विकास कामे, निधी खर्चात दिरंगाईच्या कारणावरुन पालकमंत्री जयंत पाटील यांनी शनिवारी जिल्हा नियोजनच्या बैठकीत अधिकाऱयांची झाडाझडती केली. जिह्यात प्रशासन गतीने आणि सुरळीत (करेक्ट) चालले पाहिजे. लोकांच्या हिताची कामे परिपूर्ण, नियमाने आणि गतीने झाली पाहिजेत, असे निर्देश देऊन यामध्ये अडथळे आणणाऱयांची गय केली जाणार नाही, असे प्रतिपादन पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले. कामाकडे दुर्लक्ष करु नका. कामाची गती वाढवा अन्यथा जिह्याबाहेर सन्मानाने सोयीच्या ठिकाणी पाठविण्यात येईल, असेही अधिकाऱयांना सुनावले. वीज कनेक्शन जोडणीत दिरंगाई तसेच ट्रान्सफॉर्मर बसविण्याचे काम संथ गतीने सुरु आहे. वेळोवेळी सूचना देऊनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने संबंधित ठेकेदारावर फौजदारी दाखल करण्याचे आदेशही पालकमंत्री पाटील यांनी बैठकीत दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात पालकमंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. जिल्हा वार्षिक योजनांचा कमी खर्च झाला आहे. मोठय़ा प्रमाणात निधी अखर्चित असल्याने मार्चएण्डपूर्वी शंभर टक्के खर्च होण्याबाबत साशंकता आहे. अधिकाऱयांनी खर्चात कसर केल्याने त्यांना धारेवर धरले. कामाची गती संथ आहे. त्यामध्ये सुधारणा करण्यात यावी, यापुढे कामचुकारपणा सहन केला जाणार नाही. काम जमत नसेल सांगा. तुम्हांला जिह्याबाहेर सन्मानाने सोयीच्या ठिकाणी पाठविण्यात येईल, असा इशारा पालकमंत्री पाटील यांनी दिला.
महावितरण कंपनीकडून साडेचार हजार शेतकऱयांना शेतीपंपाचे जोडणीची निविदा भारत इलेक्ट्रिकल कंपनीला देण्यात आले आहे. या कंपनीला एका वर्षात काम करायचे होते. मात्र मुदत संपल्यानंतरही केवळ सहाशे शेतकऱयांना वीज जोडणीचे काम केले. संबंधित ठेकेदार अनेक कामे घेत असल्याने काम धिम्यागतीने सुरु असल्याचा आरोप आ. पृथ्वीराज देशमुख यांनी केला. सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, आ. अनिल बाबर यांनी ठेकेदाराच्या कामांबाबत नाराजी व्यक्त केली. याप्रकरणाची गंभीर दखल घेत पालकमंत्री पाटील यांनी ठेकेदारावर फौजदारी करण्याचे आदेश दिले. दिव्यांगांना प्रमाणपत्रासाठी जतमधून मिरजेला हेलपाटे मारावे लागतात. प्रमाणपत्रासाठी अनेकदा त्रुटी काढल्या जात असल्याबद्दल आ. विक्रम सावंत यांनी नाराजी व्यक्त केली. याबाबत वैद्यकीय अधिष्ठातांनी लक्ष घालावे, अशा सूचना खा. संजयकाका पाटील यांनी केल्या.
आटपाडी तालुक्यातील सहा हजार शेतकऱयांचे पंचनामे झाले नसल्याने विमा योजनेचा लाभ मिळाला नसल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्य अरुण बालटे यांनी केला. कृषि विभाग आणि पर्जन्यमान करणाऱयांमध्ये साटेलोटे असून पावसाच्या आकडेवारीत खाडाखोड केली जाते. त्यामुळे शेतकऱयांना फटका बसला, त्याबाबत संबंधित अधिकाऱयांचा शोध घेण्याची मागणी केली. उमदी येथील पोलीस ठाण्यात अतिक्रमण करण्यात आले आहे. ते काढण्याची मागणी सदस्य सरदार पाटील यांनी केली.
आमदार खाडे – होनमारे यांच्यात खडाजंगी
मिरजेचे आ. सुरेश खाडे आणि राष्ट्रवादीचे बाळासाहेब होनमोरे यांच्यात नियोजन समितीच्या सभेत आधार कार्डासाठी आमदार पत्रावरुन खडाजंगी झाली. मिरजेत नवे आधार कार्ड काढण्यासाठी आमदाराची शिफारस घेण्याचा प्रकार सुरु आहे. त्यासाठी चार-चार महिने शिफारस पत्र मिळत नाही. यामुळे लोकांना त्रास होत असल्याने आधारकार्डासाठी शिफारस बंद करण्याची मागणी केली. त्यानंतर खाडे यांनी माझा चार्ज तुम्हांला देतो असे सांगितले. मात्र होनमोरे यांनी अधिकारच नाही, मग चार्ज कशासाठी? असा सवाल उपस्थित केला.