मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांचा खासदारांना सवाल मनसेच्या याचिकेनंतर हालचाली सुरू : हायवेचे लोकार्पण करून टोलचा मलिदा खाण्याचा डाव!
प्रतिनिधी / कणकवली:
राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचे काम अजूनही अपूर्ण असताना खासदार विनायक राऊत ते मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण करण्याचे बोलत आहेत. कुडाळातील बॉक्सेल ब्रिजबाबत खासदारांनी दिलेले आश्वासन, कणकवलीतील कोसळलेल्या ब्रिजचे काम अजूनही झालेले नाही. असे निकृष्ट काम लोकार्पण करून टोल चालू करून मलिदा खाण्यासाठी हा प्रयत्न आहे. तसेच ठेकेदाराचे वकीलपत्र घेऊन काम सोडण्याचा प्रस्ताव दिल्याबाबत माहिती पसरविली जात आहे. मनसेने उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यावर आलेल्या नोटिसीनंतर ठेकेदाराकडून काम सोडण्याचा अर्ज दिला आहे. पुढील सुनावणीदरम्यान, हा सारा प्रकारही आम्ही न्यायालयाच्या निदर्शनास आणून देणार असल्याचे मनसेचे सरचिटणीस, माजी आमदार परशुराम उपरकर यांनी सांगितले.
येथील संपर्क कार्यालयात पत्रकारांशी बोलताना उपरकर म्हणाले, निकृष्ट काम, मोबदला नाही, वृक्षतोड याबाबत इतर पक्षांसोबतच मनसेनेही आवाज उठविला. आंदोलने, रास्तारोको केले. मात्र, यातून काही निष्पन्न होत नसल्याने आम्ही उच्च न्यायालयात ऍड. तेजस धांडे यांच्यामार्फत जनहित याचिका दाखल केली आहे. यात जुलै महिन्यात कोसळलेला ब्रिजचा भाग, निकृष्ट काम, खड्डेमय रस्ते, रस्त्यांना तडे जाणे या सर्व प्रकाराबाबत आम्ही न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलेले आहे. यात अप्पर सचिव रस्ते वाहतूक मंत्रालय, नवी दिल्ली, मुख्य अभियंता, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, कार्यकारी अभियंता, मुख्य वनसंरक्षक कोल्हापूर, उपवनसंरक्षक सावंतवाडी, जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग, केसीसी, दिलीप बिल्डकॉन, आरटीफॅक्ट कंपनी, इंडिया इफ्राटेक यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. यावर 4 नोव्हेंबरला ऑनलाईन सुनावणी झाली. अजून पैसे नाहीत, काही ठिकाणी सर्व्हेही अपूर्ण आहे. ड्रेनेज निचरा नाही, अशा गोष्टीही न्यायालयाच्या निदर्शनास पुढील तारखेला आणून देण्यात येणार आहेत.
एकीकडे ही परिस्थिती असताना खासदार रस्ता लोकार्पणाची भाषा बोलत आहेत. कुडाळच्या जनतेला 118 कोटींचा ब्रिज मंजूर केल्याचे आश्वासन खासदारांनी दिले होते. मात्र, त्याचे पुढे काय झाले? कणकवलीतील ब्रिजची भिंत कोसळली. त्यावेळी पालकमंत्री, खासदारांनी चौकशी अहवाल आल्यावर कारवाई होईल, असे सांगितले. त्या चौकशी अहवालाचे काय झाले? अशाप्रकारचे निकृष्ट काम लोकार्पण करून काय साध्य करणार? असा सवाल उपरकर यांनी केला आहे.
यावेळी उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्राr, मनसेच्या विद्यार्थीसेनेचे जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर, मनसेचे जिल्हासचिव बाळा पावसकर, तालुकाध्यक्ष दत्ताराम बिडवाडकर, चंदन मेस्त्राr, सचिन ताडे, सुधीर तावडे, राजन टंकसाळे व इतर उपस्थित होते.
असे काम सोडता येत नाही!
आता ठेकेदाराचे वकीलपत्र घेऊन काहीमंडळी ठेकेदार काम सोडणार असल्याची माहिती पसरवीत आहेत. ते पत्रही आम्ही मिळविणार असून न्यायालयात सादर करणार आहोत. ठेकेदाराला अशाप्रकारे काम बंद करता येत नाही. आमच्या नोटिसीनंतर हा प्रकार सुरू झाला आहे. हे सुद्धा आम्ही न्यायालयाच्या निदर्शनास आणून देणार असल्याचे उपरकर म्हणाले.