अचूक बातमी “तरुण भारत”ची, उपमुख्यमंत्री-आरोग्यमंत्री दौरा स्पेशल
● अजितदादांचा प्रशासनाला इशारा ● अधिकारी, कर्मचाऱ्यांनो, नुसता बसून पगार खावू नका
प्रतिनिधी / सातारा :
जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत प्रशासनातील अनेक घटक नुसता बसून पगार घेत आहेत. महिन्याला 12 हजार कोटी रुपये राज्य शासन अधिकारी, कर्मचाऱयांच्या पगारावर खर्च करते. मात्र, कोरोना साथ रोगाच्या साथीत आपण लोकांचे काही देणे लागतो या भावनेतून काम होत नाही. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी फक्त चांगले प्रेझेंटेशन दिले असले तरी आता प्रशासनातील सर्व विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना कामाला लावून येत्या काळात लोकांना चांगली आरोग्य सेवा मिळावी, गावागावात कॉट्रक्ट ट्रेसिंग गतीने करावे आणि ज्या ज्या तालुक्यात रुग्ण संख्या अधिक आहे तिथे नियम कडक करुन संसर्ग रोखण्याचा प्रयत्न करावा. गृहविलगीकरण तातडीने बंद करुन कोरोना केअर सेंटर सुरु करावेत. आता प्रशासनाने कामाच करुन करुन दाखवावे, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, अश्या टपल्या उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिल्या.
कोरोना संसर्गाने जिल्हय़ात निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी खुद्द साताऱयात येवून घेतला. यावेळी झालेल्या आढावा बैठकीस पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार पृथ्वीराज चव्हाण, आमदार शिवेंद्रराजे भोसले, आमदार मकरंद पाटील, आमदार दीपक चव्हाण, आमदार जयकुमार गोरे, जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले तसेच कोल्हापूरचे विशेष पोलीस महानिरीक्षक लोहिया, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधिक्षक अजयकुमार बंसल या बैठकीला अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी यांची उपस्थिती होती.
यावेळी अधिकारी तसेच लोकप्रतिनिधींकडून जिल्हय़ातील कोरोना स्थितीचा आढावा घेतल्यानंतर आरंभीपासून अजितदादा पवार यांनी दुसऱया लाटेत प्रशासनाकडून ज्या पध्दतीने काम सुरु आहे त्याबाबत नाराजी व्यक्त केली. जिल्हय़ातील गृहविलगीकरणातील रुग्णांकडून नियम पाळले जात नसल्याने ग्रामीण भागात कोरोना मोठय़ा प्रमाणावर वाढलाय. त्यामुळे गृहविलगीकरण तातडीने बंद करुन कोरोना केअर सेंटर सुरु करण्यासाठी प्रशासनाने तातडीने यंत्रणा राबवावी. जिल्हय़ाला कोणत्याही प्रकारे निधी कमी पडू दिलेला नाही व यापुढे देखील पडणार नाही. मात्र, प्रशासनातील सर्व विभागातील अधिकारी, कर्मचाऱयांची या लढाईत मदत घेवून सर्वांच्या मदतीने वाढता संसर्ग रोखण्यासाठी एकजुटीने प्रयत्न केले पाहिजेत.
ज्या ज्या गावात बाधितांची संख्या जास्त आहे तिथे गतवर्षी ज्या पध्दतीने तालुका पातळीवरील यंत्रणांनी काम केले तसेच काम आता पुन्हा करावे लागणार आहे. कॉन्ट्रक्ट ट्रेसिंगचे काम जलद गतीने केल्यास आणि तातडीने लक्षणे असलेल्या वा नसलेल्या रुग्णाचे विलगीकरण करुन नियम पाळले गेल्यास संसर्ग वाढणार नाही, त्यासाठी आता प्रशासनातील सर्व विभागातील अधिकारी, कर्मचाऱयांना कामाला लावा, जे कोणी ऐकत नसतील त्यांच्यावर कारवाई करा, अशी कडक सूचना अजितदादा पवार यांनी दिली.
राजकारण करण्याची ही वेळ नाही जिल्हय़ातील बाधित येणाऱया प्रत्येक नागरिकाला उपचार मिळाले पाहिजेत. ही लढाई एकत्रित येवून लढण्याची वेळ आहे. यात कोण कोणत्या गटाचा, पक्षाचा हे असले कोणीही करु नका. ही ती वेळ नाही, ते जेव्हा करायचे तेव्हा करुच.
मात्र, आता वेळेत निदान, वेळेत उपचार करुन मृत्यूदर कमी केला पाहिजे. वाढता संसर्ग रोखण्यासाठी इतर काही लोकप्रतिनिधी स्वतःहून पुढाकार घेवून काम करत आहेत त्यांचाही आदर्श घेवून ही लढाई जिंकण्यासाठी सर्वांचेच योगदान महत्वाचे ठरणार आहे. यामध्ये शासनाकडून निधीची कमतरता भासणार नाही तसेच कोणत्याही गोष्टीचा काळाबाजार खपवून नाही, या सर्व बाबींवर प्रशासनाने कामच केले पाहिजे, अशी तंबी अजितदादा पवार यांनी दिली.कोरोना संसर्गाची तिसरी लाट येणार असल्याचा अंदाज तज्ञ व्यक्त करीत आहे. या लाटेचा सामना करण्यासाठी जिह्यात आरोग्य सुविधा वाढविण्यावर भर देत असल्याचे पालकमंत्री बाळसाहेब पाटील यांनी या बैठकीत सांगितले.
बैठकीच्या अनुषंगाने गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, माजी मुख्यमंत्री तथा आमदार पृथ्वीराज चव्हाण, आमदार अरुण लाड, आमदार मकरंद पाटील, आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार जयकुमार गोरे, आमदार दिपक चव्हाण यांनीही उपयुक्त अशा सूचना केल्या.
आरोग्यमंत्र्यांकडून कानपिचक्या
कॉन्ट्रक्ट ट्रेसिंग हे वैधानिक दृष्टीने आहे ते करावे. जिल्हय़ातील होम आयसोलेशन कमी करा. कोरोना केअर सेंटर तातडीने सुरु करुन तिथे स्वच्छता, साफसफाई चांगली असणे आवश्यक आहे. कोरोना रुग्णाच्या सर्व टेस्ट या कोरोना केअर सेंटर, कोव्हिड हॉस्पिटलमध्येच करता. रुग्णांना टेस्टसाठी अजिबात बाहेर पाठवू नका. लसीकरणाचे योग्य नियोजन करुन ते देताना त्या ठिकाणी सर्व नियम पाळून तसेच तिथे योग्य बंदोबस्त तैनात सर्वांना लस मिळण्यासाठी यंत्रणांनी काम करावे. जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयात हॉस्पिटल मॅनेजर हे पद निर्माण करावे, जेणेकरून अधिक सुलभता येईल. रुग्णाला अधिक चांगली सेवा मिळेल. जे कंत्राटी डॉक्टर सेवा देत आहेत, त्यांचे मानधन वाढवण्याबाबत विचाराधीन आहोत. नियमानुसार खाजगी लॅब काम करत नसतील तर त्यांचा रजिस्ट्रेशन रद्द करा, आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करा, खाजगी रुग्णालयातील दररोज बिलाचे ऑडिट करावे, अशा ही सूचना आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिल्या.
सीएसना तंबी तर एसपी बन्सल यांच्यावर अजित दादा नाराज
कोरोना आढावा बैठकीत अजितदादा पवार यांनी एसपी बंसल यांच्यावर नाराजी व्यक्त केली. पोलीस दलाकडून ज्या पध्दतीने काम अपेक्षित आहे ते झालेच पाहिजे. संसर्ग कमी करायचा असेल नियम पाळावेच लागतील. लसीकरण केंद्रावर पोलीस बंदोबस्त ठेवा. सर्वांना लस मिळेल. त्यात कोणीही आमदार, खासदार, नगरसेवक व लोकप्रतिनिधी यांचा हस्तक्षेप मला नकोय. आमदार निधीमधून व्हेंटिलेटर तात्काळ खरेदी करा अन्यथा तुमच्यावर कारवाई करावी लागेल, अशी तंबी सीएसना दिली.
प्रशासनातील सर्व विभागातील कर्मचाऱ्यांना कामाला लावा
पहिल्या लाटेत चांगले काम केले. मात्र, दुसऱया लाटेत अत्यंत बेफिकीर काम सुरु आहे. पगारा प्रमाणे कर्मचाऱयांकडून काम करून घ्या, जे नकार देतील त्यांच्यावर कारवाई करा अजिबात लाड नको. 15 टक्के उपस्थिती आहे. इतर कर्मचारी घरी बसून पगार घेत आहेत हे योग्य नाही. माध्यमिक शिक्षकांकडून व्यवस्थित होत नाही. अधिक्षक अभियंता बांधकाम जरा फिरा घरात बसू नका. जरा यंत्रणा हालवावे. नियम कडक करा, संसर्ग आटोक्यात आला पाहिजे. त्यामुळे सर्वांनी जबाबदारी काम करा अन्यथा मी कोणाचीही बेजबाबदारी खपवून घेणार नाही, अशी तंबीच अजितदादांनी दिली.
यावर्षी प्रातिनिधीक सुध्दा वारी होणार नाही
कोरोना संसर्ग वाढतोय. तो कमी करण्यासाठी येत्या काळात काम करत असताना आता माऊलींचा पाखली सोहळाही आलाय. यावर जिल्हय़ातील लोकप्रतिनिधींनी यावर्षी सोहळा पूर्णतः रद्द करावा, अशा सूचना मांडल्या. कारण माऊंलीची पालखी ज्या ज्या गावातून जाते तिथे भाविकांची गर्दी होणार व त्यामुळे संसर्ग वाढण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे वारी रद्द करण्याची सुचना पुढे आल्यावर यावर देखील राज्य शासन योग्य निर्णय घेवून वारीतील संसर्ग टाळण्यासाठी वारी रद्द करण्याचा निर्णय घेईल, अजितदादा पवार यांनी यावेळी सांगितले.
पत्रकार परिषदेत झडल्या आरोपांच्या फैरी
पुणे जिल्हय़ात 500 संख्येने रुग्ण येत आहेत. सातारा जिल्हय़ात दररोज दोन हजारांच्या वर बाधित आणि 30 च्या वर मृत्यू होत असताना प्रशासन नेमके काय करतेय ? काही लोकप्रतिनिधी तर कामच करत नाहीत. या स्थितीत जनतेला वाली कोण ? जिल्हय़ात निलेश लंके का तयार होत नाही ? अशा आरोपांच्या फैरी झडल्यावर त्यावर स्पष्टीकरण देताना अजितदादा पवार काही मुद्दे स्पष्ट केले तर आमदार मकरंद पाटील त्यांची बाजू सावरण्यास पुढे सरसावले होते. परिस्थिती आटोक्यात येण्यासाठी यापुढे काम होईल, असा शब्द अजितदादांनी दिला. त्यासाठीच आलो होतो व ज्यांना जे काही सांगायचे ते सांगितले असल्याचे त्यांनी सांगितले.
जिह्यातील प्रत्येक मोठय़ा गावात 30 बेडचे हॉस्पिटल करावे
जिह्यातील प्रत्येक कोविड रुग्णालयात पूर्ण वेळ ऑडीटर नेमावेत तसेच मोठय़ा गावात 30 बेडचे रुग्णालय सुरु करावे, कोविड सेवेतले कर्मचारी सोडून इतर अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर विविध जबाबदाया द्या, त्या करून घ्या. येत्या काही दिवसात कोरोना संसर्ग साखळी तुटली पाहिजे असे नियोजन करा अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.
गृह विलगीकरण बंद करा फक्त संस्थात्मक विलगीकरण
गृह विलगीकरणामुळे आख्खेच्या आख्खे कुटुंब बाधित होत आहेत. यामुळे जिह्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. गृह विलगीकरण बंद करुन कोरोना संसर्ग झालेल्या व्यक्तींचे संस्थात्मक विलगीकरण करण्यात यावे, अशा सूचना करुन उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले, कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांचा 24 तासात शोध लावून त्यांची पहिल्यांदा कोरोना चाचणी करावी. जिह्यात कडक निर्बंध लावले आहेत. तरीही काही नागरिक बेजबाबदारपणे बाहेर फिरत आहेत, अशांवर पोलीस विभागामार्फत कडक कारवाई करावी.