ऑनलाईन टीम / मुंबई :
2012 च्या निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणात दोषी ठरलेल्या चौघांना आज पहाटे साडेपाच वाजता फासावर लटकवण्यात आले. सात वर्षांनंतर निर्भयाला आज खरा न्याय मिळाला. निर्भयाच्या आरोपींना फाशीवर लटकवल्यानंतर देशभरात आनंदाचे वातावरण आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी निर्भयाला मिळालेल्या न्यायावर आपल्या भावना ट्विटच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत.
त्या आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, निर्भयाच्या दोषींना फासावर लटकवण्यात आले. कायद्याचा सन्मान राखला गेला. आपल्याकडे कायद्याचे राज्य आहे. महिलांवर अत्याचार करणाऱयांची गय केली जाणार नाही हा संदेश देणारी ही घटना आहे. या आरोपींची फाशी असे गुन्हे करणाऱयांच्या मानसिकतेला सणसणीत चपराक आहे, असे म्हणत त्यांनी निर्भयाला श्रद्धांजली अर्पण केली आहे.