पुणे / प्रतिनिधी :
आंदोलने करूनही व्यवस्थेत आवश्यक ते बदल होत नाहीत. त्यामुळे आता कायमचेच मौन धारण करावे, असे वाटते,’ अशा शब्दांत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आपली उद्विग्नता व्यक्त केली.
निर्भया प्रकरणातील दोषींना लवकर फाशी देण्यात यावी, या मागणीसाठी अण्ण्णांनी 20 डिसेंबरपासून मौन सुरू केले आहे. या प्रकरणासंबंधी दिल्ली उच्च न्यायालयात रविवारी सुनावणी झाली. आरोपींच्या फाशीच्या अंमलबजावणीवर लावण्यात आलेली स्थगिती उठविण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका केंद्र सरकार व तिहार कारागृहाच्या वतीने करण्यात आली आहे. त्यावर सुनावणी झाल्यानंतर कोर्टाने आपला निर्णय राखून ठेवला. त्यामुळे फाशीची अंमलबजावणी तूर्त प्रलंबितच राहिली आहे.
फाशी लांबत असल्याने हजारे यांचे मौनही लांबत आहे. त्यामुळे त्यांच्या काही सहकाऱयांनी आणि ग्रामस्थांनी गावातील हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने मौन मागे घ्यावे, अशी विनंती हजारे यांना केली आहे. गावात सध्या अखंड हरिनाम सप्ताह आहे. गुरुवारी त्याची सांगता होत आहे. त्यावेळी हजारे यांनी आपले मौन मागे घ्यावे, अशी सूचना सहकाऱयांनी केली होती. याला हजारे यांनी तूर्त तरी नकार दिला आहे. लिखित संदेशातून त्यांनी आता मला वाटते शेवटपर्यंत मौन धारण करावे, असे म्हटले आहे.