या वर्षाने सामाजिक पातळीवर मोठा हाहाकार माजवला. दरवषी पंचांगात संक्रांतीचा उल्लेख असतो. ती कशावर बसून येणार हे सांगितलेले असते. यंदा देशावर कोरोना नावाची संक्रांत आली. तिचे वाहन कोणते होते यावर मतभेद असतील. काहींच्या मते ती ट्रंप साहेबांच्या विमानातून आली. काहींना ते मान्य नाही. ती आली हे मात्र खरे.
कोरोनाने लोकांना चार गोष्टी शिकवल्या. काही बाबतीत लोकांपुढे हात टेकले. चारचौघात वावरताना नाकावर मास्क लावणे आवश्यक होते. पण आपले नाक आणि ओ÷द्वय अतिशय देखणे आहेत आणि जगाला अहोरात्र त्यांचे दर्शन घडवणे हे आपले कर्तव्य आहे या भावनेतून लोक मास्क न लावता किंवा हनुवटीवर मास्क लावून फिरत राहिले. ज्यांच्याकडे सवड होती ते लोक कोरोनावर भलेबुरे विनोद जुळवून जगाला हसवण्याचे प्रयास करीत राहिले.
सरकारने आधी जनतेला काही होमिओपॅथिक गोळय़ा सुचवल्या, वाटप देखील केले. आयुर्वेदवाल्यांनी काही काढे बाजारात आणले. सरकारने सुचवलेले एक औषध तर चक्क ट्रंप साहेबांनी हट्ट धरून दरडावणीच्या सुरात आपल्याला मागितले. इम्युनिटी हा परवलीचा शब्द बनला. इम्युनिटी वाढण्यासाठी पब्लिक काहीही करायला, विकत घ्यायला तयार होती!
प्रवाहाविरुद्ध पोहणारे शहाणे जन प्रत्येक काळात, प्रदेशात असतातच. कोरोना-बिरोना झूठ आहे. आपल्याला फसवण्यासाठी पाश्चात्यांनी रचलेला डाव आहे अशी मांडणी करणारे व्हॉट्सअपवीर याही काळात उदयाला आले. त्यातले एक विक्रमवीर स्वतःच कोरोनाने गेले.
ऍलोपथीबद्दल विरोधाची सुप्त भावना काही लोकांमध्ये आढळते. तिचा गैरफायदा घेतला जातो. उत्तरेच्या पट्टय़ात कोरोनापासून रक्षण करणारे तथाकथित ताईत विकणाऱया साधूने आणि मध्य प्रदेशात रुग्णाच्या हाताचे चुंबन घेऊन कोरोना बरा करतो म्हणणाऱया साधूने अवतार घेतले. यथावकाश दोघांचे कोरोनाने बळी घेतले. एका मंत्री महोदयांनी ‘भाभीजी का पापड’ खाल्ल्यावर कोरोना बरा होतो, अशी भलावण केली. त्यांनाच कोरोना झाला.
एका बाबतीत सर्वधर्मीय सामान्य माणूस विवेकाने वागला. प्रत्येक सणासुदीला पुढाऱयांनी लोकांना चिथावणी देण्याचे प्रयत्न केले. पण सर्वच धर्मातील बहुतांश लोकांनी आपापले सण उंबरठय़ाच्या आत आणि संयमपूर्वक साजरे केले.
नव्या वषी हा कोरोना आणि त्याचे नवे भावंड आपल्याला त्रास न देवो ही शुभेच्छा !