कधी कधी माझ्या डोळय़ांसमोर एक चित्र येते, मंत्रीमहाशय सैन्यप्रमुखांना विचारत आहेत, “सीमेवर काय परिस्थिती आहे? शत्रूला आपण योग्य प्रत्युत्तर देऊ शकू? आपली तयारी पूर्ण झाली आहे? सैन्याला सरकारकडून काय काय हवे आहे?’’ आणि सैन्यप्रमुख उत्तर देतात, “थोडा वेळ थांबा, सर. मी अमुक वाहिनीच्या वार्ताहराला विचारून सांगतो.’’
माझ्या मनातले चित्र वाचकांना अतिशयोक्त वाटेल. पण नियमितपणे वृत्तवाहिन्या पाहिल्या तर तसे होणार नाही. वृत्तवाहिन्यांना सीमेवरील तणावांची चाहूल लागली की टीव्हीच्या लगेच पडद्यावर संरक्षणतज्ञ प्रकट होतात. बॉलीवुडमधला नट एका चित्रपटात डॉक्टर, पुढच्या सिनेमात पोलीस, तिसऱयात कामगार नेता, चौथ्यात पुढारी आणि असा कोणत्याही सिनेमात कोणीही बनून समोर येतो आणि दोनअडीच तास आपण त्याला त्या रूपात मान्य करतो. वृत्तवाहिन्यांमधल्या तज्ञांची तशीच गंमत असते. काही महिन्यांपूर्वी ज्याने भाजप किंवा शिवसेना किंवा राष्ट्रवादीच्या आतल्या गोटातल्या बातम्या आणि सरकार बनवण्यासाठी किंवा पाडण्यासाठी चालू असलेल्या विविध नेत्यांच्या पुढच्या गुप्त चाली आपल्याला सांगितलेल्या असतात, त्यानेच दोन महिन्यांपूर्वी कोरोनामुळे कोणत्या देशात किती जणांना बाधा होईल, किती लोक मरण पावतील वगैरे आकडेवारी सांगितलेली असते आणि ज्याने कोरोनावर अमुक तालुक्मयातल्या तमुक हौशी इसमाने कोरोनावर रामबाण औषध शोधल्याची ब्रेकिंग न्यूज ओरडून सांगितलेली असते त्यानेच नंतर डझनभर ठिकाणच्या दोन डझन लोकांनी रामबाण औषध शोधल्याच्या बातम्या तितक्मयाच उत्साहाने सांगितलेल्या असतात. पुढेमागे हिमयुगात किंवा प्रलयात आपली संस्कृती नष्ट झाली आणि नंतर परग्रहावरून आलेल्या पाहुण्यांनी उत्खनन केल्यावर वृत्तवाहिन्यांनी दाखवलेल्या बातम्यांच्या चित्रफिती सापडल्या तर त्यांना वाटेल. एकविसाव्या शतकात भारताची इतर देशांशी किमान चार डझन युद्धे झाली असावीत. युद्धतज्ञ प्रेक्षकांना गंभीरपणे सीमेचे नकाशे दाखवत आहेत. देशाने शत्रूवर हल्ला केल्याची काय तयारी केली हा गुप्त तपशील दाखवत आहेत. आपल्या सैन्याची संख्या, रणगाडे, विमाने, अण्वस्त्रे, टीव्हीवाल्यांना सगळे सगळे ठाऊक असते! सगळे तपशील पडद्यावर दाखवले तरी शत्रू सावध होणार नाही अशी त्यांची पुरेपूर खात्री असते. पुन्हा पुन्हा संपादक वार्ताहरांना विचारत असतात,
“काय सांगशील? सांग ना!’’