कुठले मोठे युद्ध नव्हते, केवळ पाकिस्तानींना हटविण्याचे काम
वृत्तसंस्था/ शिमला
हिमाचल प्रदेशात पोटनिवडणुकांमुळे वातावरण तापलेले असताना काँग्रेस उमेदवार प्रतिभा सिंह यांनी कारगिल युद्धासंबंधी वादग्रस्त विधान केले आहे. मंडी लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार प्रतिभा सिंह यांनी कारगिल हे काही मोठे युद्ध नव्हते असे म्हटले आहे. कारगिल युद्धात भारताचे 527 सैनिक हुतात्मा झाले होते आणि यातील 52 सैनिक हे हिमाचल प्रदेशातील होते.
आमच्या भूमीवर पाकिस्तान्यांनी कब्जा केला होता, केवळ त्यांना हटविण्याचे काम करण्यात आले. त्यात कुणी भाग घेतला असेल तर ती काही मोठी गोष्ट नव्हती. कारगिल युद्ध छोटी लढाई होती असे काँग्रेस नेत्याने मंडी जिल्ह्य़ातील एका गावातील प्रचारसभेला संबोधित करताना म्हटले आहे.
भाजपने एका माजी सैनिकाला उमेदवारी दिली आहे, त्याने कारगिल युद्धात भाग घेतला होता, पण ते काही मोठे युद्ध नव्हते. पण भाजप उमेदवार खुशहाल ठाकूर यांना ते मोठे सैनिक राहिल्याचे आणि विजय प्राप्त केल्याचे दाखवून देण्यात येत आहे. सैनिक, माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांची मते मिळविण्यासाठी भाजप हे सर्व करत असल्याचे प्रतिभा सिंह यांनी म्हटले आहे.
राजकारणाचा आरोप
मुख्यमंत्री जयराम ठाकूर हे भाजप उमेदवाराला कारगिल युद्धातील नायक म्हणून प्रचार करत आहेत. कारगिल युद्धाच्या नावावर भाजप या निवडणुकीत सैन्याच्या पराक्रमाला स्वतःचा विजय ठरवून भावनांशी खेळत असल्याच आरोप त्यांनी केला आहे. तर काँग्रेस सैनिकांचा अपमान करत असल्याची टीका भाजपने केली आहे.