राष्ट्रपती कोविंद यांचे हुतात्मा सैनिकांना अभिवादन
@ बारामुल्ला / वृत्तसंस्था
23 वा कारगिल विजय दिन देशभरात साधेपणाने साजरा करण्यात आला आहे. 1999 मध्ये याच दिवशी, अर्थात, 26 जुलै 1999 ला भारतीय सेनेने पाकिस्तानी सैनिकांनी केलेली घुसखोरी मोडून काढत पाक सेनेला धूळ चारली होती. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी बारामुल्ला येथील ‘डॅगर’ युद्ध स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून या युद्धात हुतात्मा झालेल्या सैनिकांना अभिवादन केले.
वास्तविक राष्ट्रपती कोविंद यांचा मूळ कार्यक्रम श्रीनगर येथे हुतात्मा स्मारकाला अभिवादन करण्याचा होता. तथापि, हवामान अनुकूल नसल्याने त्यांना श्रीनगरला जाता आले नाही. तेथे त्यांना जाता न येण्याचा हा गेल्या तीन वर्षांमधील दुसरा प्रसंग आहे. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनीही या युद्धात हुतात्मा झालेल्या सैनिकांना श्रद्धांजली अर्पण केली.
द्रास येथेही कार्यक्रम
द्रास येथील हुतात्मा सैनिक स्मारकावर पुष्पचक्र वाहण्यात आले. तिन्ही सेनादलांचे संयुक्त प्रमुख बिपीन रावत, तसेच लडाखचे भाजप खासदार त्सेरिंग नामग्याल यांनी स्मारकाला अभिवादन केले. काँगेस नेते राहुल गांधी, तृणमूल काँगेस नेत्या ममता बॅनर्जी व इतर अनेक मान्यवर नेत्यांनीही अभिवादन केले.
इतरत्रही कार्यक्रम
देशभरात इतरत्रही कोरोनाचे नियम पाळून हा दिन साजरा करण्यात आला. अनेक राज्यांच्या राजधान्यांमध्ये लहान प्रमाणात कार्यक्रम करण्यात आले होते. कोरोना परिस्थितीमुळे मोठय़ा प्रमाणात गर्दी जमविणे टाळण्यात आले.
ऑपरेशन विजय
1999 च्या जून आणि जुलै महिन्यात भारताने लडाखच्या कारगिल आणि द्रास भागांमध्ये पाकिस्तानी सेनेला माघार घ्यायला लावली होती. ऑपरेशन विजय या नावाने ही मोहीम ओळखली जाते. त्यापूर्वी पाकिस्तानने एकीकडे भारताशी सौहार्दपूर्ण संबंध प्रस्थापित करण्याचे नाटक करत दुसरीकडे कारगिल भागातील डोंगरमाथ्यांवर आपले सैनिक घुसविले होते. ही बाब भारताच्या उशिरा लक्षात आली. मात्र नंतर भारतीय सैनिकांनी पराक्रमाची शर्थ करीत पाकिस्तानने ताब्यात घेतलेली सर्व पर्वतशिखरे पुन्हा आपल्याकडे घेतली. 26 जुलै 1999 या दिवशी पूर्ण पाकिस्तानी सेना मागे हटल्यामुळे भारताचा विजय झाला होता.