संपूर्ण भारताने कालच 21 व्या कारगील विजय दिवसाच्या निमित्ताने देशासाठी प्राणांची आहुती देणाऱया शेकडो हुतात्म्यांची स्मृती जागवली. 1999 साली झालेल्या या युद्धात शांततेच्या अपेक्षेत असलेल्या भारताला उतरणे भाग पडले होते. पाकिस्तानच्या दारात आलेल्या वाजपेयी यांना अभिवादन करण्यास टाळणाऱया मुर्शरफ आणि त्यांच्यासारख्याच माथेफिरू लष्करी अधिकाऱयांनी याच दरम्यान कारगीलमध्ये भारतीय हद्दीत आठ ते नऊ किलोमीटर आत घुसखोरी करून भारताचा सामरिकदृष्टय़ा महत्त्वाचा भाग गिळंकृत करण्याचा डाव रचला होता. सियाचीन टोकाला जाणारा राष्ट्रीय महामार्ग रोखायचा आणि लडाखकडे जाणारी भारतीय रसद, भारतीय सैनिकी ताफ्याची वाहतूक रोखायची त्यामुळे भारताला कायमचा हा भाग सोडून द्यावा लागेल आणि पाकिस्तान, चीन, नेपाळ दरम्यानच्या सगळय़ा सीमेवर हळूहळू भारताला कमकुवत करून येथे कायमची अस्थिरता माजवायची हा त्यांचा डाव होता. 21 वर्षांपूर्वी आपल्या शूर सैनिकांनी या कारस्थानालाच मूठमाती देऊन कारगीलच्या डोंगरांमध्ये गाडले. त्याला 21 वर्षे झाली आहेत. पण, म्हणून भारतासमोरचे आव्हान संपले आहे का? जे कारस्थान पाकिस्तानने रचले ते खरोखर केवळ पाकिस्तानचेच होते की त्यामागेही चीन होता, अशी शंका वाटाव्यात अशा घटना नजीकच्या काळातच चीनद्वारे गलवान खोऱयात घडलेल्या आहेत. अधिकृत युद्धाची घोषणा न करता आणि शस्त्रास्त्रांचा वापर न करता पारंपरिक हत्यारांच्या साहाय्याने चीनने डोकलाम भागात जी घुसखोरी केली आणि त्याला अटकाव करणाऱया भारतीय सैनिकांवर हल्ला चढवला त्याची पद्धत शिवाय चीनचे कारस्थान आणि पाकिस्तानचे कारस्थान हे ज्या कारणांसाठी होते ते एकसारखेच असल्याचे दिसून येईल. बीबीसीने कारगील युद्धाच्या संदर्भाने अनेक तथ्यांना पुढे आणणारी अनेक वृत्ते प्रसारित केलेली आहेत. या विषयावर अनेक सैन्याधिकारी, पाकिस्तानी राजकारणी यांच्या मुलाखती, त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांमधील माहिती एकवटून कारगीलच्या स्थितीवर बराचसा प्रकाश टाकला आहे. 21 वर्षानंतर त्या सर्व घटनांना पुन्हा आठवण्याची गरज निर्माण झाली आहे. 1984 साली भारताने सियाचीन ताब्यात घेतल्याचा राग मनात ठेवून असलेल्या तत्कालीन कमांडो फोर्समधील मेजर परवेझ मुशर्रफ यांना वरिष्ठ हुद्यावर आल्यानंतरसुद्धा हे अपयश सतावत होते. त्यामुळे वाजपेयी आणि नवाझ शरीफ समझोत्याची शिखर परिषद घेत होते तेव्हाच मुशर्रफ कारगीलमध्ये जिथे भारतीय सैन्याने वावर ठेवला नव्हता तिथे आपले सैनिक तैनात करण्यात गुंतले होते. प्रारंभीच्या टप्प्यात मे 1999 मध्ये जेव्हा ही बातमी फुटली तेव्हा तर घुसखोरी ही काश्मिर स्वातंत्र्यासाठी लढणाऱया लोकांनी केली आहे असेच पाकिस्तानी लष्कर म्हणत होते. विशेष म्हणजे भारतीय लष्करालासुद्धा याची कल्पना नव्हती आणि जेव्हा याची माहिती पुढे आली तेव्हाही भारतीय नेतृत्वाला याची कल्पना द्यावी असे तेव्हाच्या लष्करी अधिकाऱयांना वाटले नव्हते. ज्याचे परिणाम पुढे फार मोठय़ा प्रमाणात भारताला भोगावे लागले. प्रयत्नांची शिकस्त करून आणि प्राण हातावर घेऊन सैनिकांनी ही पूर्णतः प्रतिकूल लढाई जिंकली. त्यासाठी 527 भारतीय जवानांनी हौतात्म्य पत्करले तर 1,363 जवान जायबंदी झाले. अटलबिहारी वाजपेयी, जॉर्ज फर्नांडिस यांच्यासारख्या कणखर आणि राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव असणाऱया व्यक्तिमत्त्वांनी या घटनेतही जे राजकीय शहाणपण दाखविले, त्याचा भारताला आजपर्यंत फायदा झाला आहे. पाकिस्तानचा बुरखा फाडण्यासाठी हे युद्ध फार महत्त्वाचे ठरले. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताने जो विजय मिळविला त्यामुळेच अमेरिकाही भारताच्या बाजूची झाली. आजही चीनच्या विरोधात ही शक्ती आपल्या उपयोगास आली आहे. तिची मुळे 1999 सालातच आहेत. पण, आजची आव्हानेही मोठी आहेत. कारगीलचे युद्ध भारताने जिंकले म्हणून पाकिस्तान कुरापती करायचा थांबला नाही. पुढे मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला. पठाणकोटच्या लष्करी तळावरच हल्ला करण्यात आला. उरी झाले, पुलवामामध्ये भारतीय सैन्याच्या ताफ्यावर आरडीएक्सनी भरलेल्या गाडीद्वारे हल्ला केला गेला. हजारो सैनिकांना मारण्याचा हा कट होता. मात्र गाडी चुकीच्या ठिकाणी धडकली आणि 40 जवानांना हौतात्म्य प्राप्त झाले. या सर्वाला त्या त्या वेळी भारतीय सैन्याने चोख प्रत्युत्तर दिले. तेव्हा पाकिस्तान पाठोपाठ चीनने आगळीक करण्यास सुरुवात केली. गेल्या वर्षी चीनने डोकलाममध्ये घुसखोरी केली. तब्बल 73 दिवस विविध पातळय़ांवरील घडामोडी घडल्या आणि नंतर चीनने माघार घेतली. या जून महिन्यात डोकलाममध्ये जे घडविण्यात आले तेही सहज घडलेले नाही. भारतीय सीमेवर हक्क सांगण्याचा होणारा हा प्रयत्न पाठोपाठ नेपाळसारख्या देशाने स्वतःच भारताच्या हद्दीला आपल्या नकाशात दाखविणे या सर्वामागे चीन आहेच. भूतानशी भारताचे चांगले संबंध असल्याने तिथेही त्यांच्या हद्दीवर हक्क सांगून भारतीय सीमा असुरक्षित करण्याचा होणारा प्रयत्न या सर्व घटनांना एकत्रित लक्षात घेतले तर भारतासमोरील आव्हान किती गंभीर आहे याची जाणीव व्हावी. अर्थात 1962 साली होता तो भारत आता राहिलेला नाही. अशावेळी भारताला जैविक युद्धाचा मोठा धोकाही व्यक्त केला जातो आहे. भविष्यातील आव्हाने अनेक आहेत. पाकिस्तानवर 21 वर्षापूर्वी ज्या धैर्य, सामर्थ्याने मात केली ती शक्ती भारतीय सैन्याचे सदैव प्रेरणास्त्रोत राहो. भारतीय लष्कर, गुप्तहेर यंत्रणा, भारताचे कुटनीतीज्ञ आणि भारतीय राजकारणी यांची संयुक्त शक्ती, सामंजस्याचा लाभ होत राहो याच अपेक्षा.
Previous Articleकोल्हापूर : जिल्हाधिकाऱ्यांकडून ‘अनलॉक’ ची नियमावली जाहीर
Next Article घरपट्टी दरवाढी मागे घ्या-हॉटेल संघटनेची मागणी
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.