22 लाखांचे नुकसान : दोन वानरांचाही मृत्यू
वार्ताहर / कारदगा
कारदगा येथील प्रगतशील शेतकरी तुकाराम अलंकार यांच्या शेतीत असलेल्या मुख्य विद्युत वाहिनीची तार तुटून पडल्याने उसाच्या फडाला आग लागून त्यांचा 13 एकर व शेजारील अभय व्हनवाडे यांचा 1 एकर ऊस आगीत भस्मसात झाल्याने सुमारे 22 लाखांचे नुकसान झाले आहे. दुर्देवाने या आगीत झाडावर बसलेल्या दोन वानरांचाही होरपळून मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी घडली.
अधिक माहिती अशी की, कारदगा गावापासून काही अंतरावर तुकाराम अलंकार यांची शेती असून या शेतीतून या परिसरातील शेतीला जोडण्यात आलेल्या विद्युत तारा गेल्या आहेत. अलंकार यांच्या शेतात मुख्य लाईनचा जोश बसविण्यात आला आहे. मात्र या जोशवरून जोडून दुसरीकडे नेण्यात आलेल्या विद्युत तारा जीर्ण झाल्या आहेत. त्यामुळे या तारा वेळोवेळी तुटून आग लागण्याचे प्रकार घडत आहेत. यापूर्वीही अलंकार यांचा तीन वेळा ऊस जळाला आहे. गुरुवारी दुपारी जोशची मुख्य तार तुटून उसाला आग लागली व बघता बघता 14 एकर ऊस या आगीत भस्मसात झाला.
घटनास्थळी भोज वीज मंडळाचे अधिकारी ताशिलदार व इतर अधिकाऱयांनी भेट देवून पाहणी केली. वीज मंडळाच्या दुर्लक्षामुळे यापूर्वी व आता 13 एकर ऊस जळून भस्मसात झाला. याबाबत आम्हाला वीज मंडळाने नुकसान भरपाई द्यावी तसेच जीर्ण झालेल्या सर्वच विद्युत तारा बदलून शेतकरी वर्गाची गैरसोय दूर करावी म्हणून दावा दाखल करणार असल्याचे तुकाराम अलंकार यांनी सांगितले.