चिपळूण
घाटमाथ्यावर घेऊन जाणाऱया अवैध गुरे वाहतुकीला चाप लावण्यासाठी पोलिसांकडून कारवाई होत असतानाच गुरे वाहतूक मात्र थांबत नसल्याचे दिसून येत आहे. गेल्या महिनाभरात झालेल्या पाच कारवाईत तब्बल 15 जणांना अटक करण्यात आली. असे असतानाही 2 दिवसांपूर्वी शिरगांव येथे गुरे वाहतूक करणारा टेम्पो पोलिसानी पकडला. या व्यवसायाची पाळेमुळे खोलवर असल्याने आणि पोलिसी धाकच राहिला नसल्याने या घटना वाढत चालल्याचे म्हटले जात आहे.
लॉकडाऊनमध्ये आवश्यक सेवा वगळता इतर सेवेप्रमाणे वाहतूकही बंद असल्याने या कालावधीत गुरे वाहतुकीच्या घटना थांबल्या होत्या. मात्र वाहतुकीत शिथिलता आल्यानंतर गुरे वाहतूक पुन्हा बिनधास्तपणे सुरु झाली आहे. काही दिवसांपूर्वी तालुक्यातील दळवटणे येथून 16 बैल कंटेनरमधून व 15 बैल आयशर टेम्पोमधून नेताना शहरातील बहाद्दूरशेख नाका येथे पकण्यात आले. या घटना ताज्या असतानाच 2 बैल बोलेरो गाडीतून घेऊन जाताना पुन्हा शिरगाव पोलिसांनी पकडल्याची घटना घडली.
यापूर्वी सावर्डे पोलिसांनी मांडकी परिसरातून गुरे वाहतुकीचा टेम्पो पकडला आहे. लागोपाठ गुरे वाहतूक पकडल्यानंतर पोलिसांकडून त्यावर अटकेची कारवाई केली जात असतानाही अवैध गुरे वाहतूक थांबेल, अशीच शक्यता होती. मात्र या व्यावसायिकांवर पोलीस अटकेची कारवाई करुनही कोणताच परिणाम झालेला नाही. उलट पोलीस कारवाईचा धाक राहिलेला नसल्याने पुन्हा गुरुवारी अलोरे-शिरगाव पोलिसांनी गुरे वाहतुकीचा बोलेरो टेम्पो पकडल्याची घटना घडली. ऑक्टोबर महिन्यात लागोपाठ गुरे वाहतूक प्रकरणी पंधराजणाना अटक झाली असून त्याच्याकडून लाखोंचा मुद्देमाल पकडला आहे.
यापूर्वी गुरे वाहतूक व गोवंश हत्या यामुळेच लोटे येथे हिंसाचारासारखा प्रकार घडला असून कामथे व पिंपळी येथे गोवंश हत्येमुळे भावनेचा प्रश्न निर्माण होऊन वातावरण तप्त झाले होते. पोलिसांच्या गतीमान तपास यंत्रणेमुळे कामथे व पिंपळी येथील प्रकाराचा छडा लागला व यात परराज्यातील टोळी असल्याचे पुढे आले होते. गोवंश हत्येसारखे प्रकार होऊ नयेत, यासाठी पोलिसांनी जनजागृती मोहीमही हाती घेतली होती. यातूनच गुरे वाहतूकदार धसका घेतील अशी चिन्हे निर्माण झालेली असतानाच अन्लॉकमध्ये गुरे वाहतूक पुन्हा बिनधास्तपणे सुरु झाल्याचे चित्र आहे. ऑक्टोबर महिन्यात एकापाठोपाठ गुरे वाहतूक पकडल्याच्या घटना घडू लागल्या आहेत.
विशेष म्हणजे गुरे खरेदीची पाळेमुळे ग्रामीण भागापर्यंत पोहोचली असून स्थानिक शेतकरीवर्गाकडून ही गुरे खरेदी करुन पुढे ती व्यावसायिकांकडून घाटमाथ्यावर कत्तलीसाठी नेली जातात. यात स्थानिक शेतकऱयांचाही सहभाग असून या व्यवसायात राजकारणीही पुढे असल्याचे स्पष्ट होत आहे. पोलीसही गुरे वाहतूक प्रश्नी मुळापर्यंत शोध घेत नसल्याच्या संधीचा फायदा घेऊन विक्रेतेही मोकाट आहेत. गुरे वाहतूक रोखणे आव्हानात्मक झाले असून वेळीच यावर नियंत्रण न आणल्यास एखाद्या गंभीर घटनेलाही समोर जावे लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे.