रस्ता रुंदीकरणामुळे पूल पाडण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू : कोने नाल्यावर ब्रिटिशांनी दीडशे वर्षापूर्वी उभारला होता पूल
प्रतिनिधी / कारवार
दीड शतकापासून ऐतिहासिक ठेवा बनून राहिलेला अरबी समुद्रातील पाण्याशी झुंज देत कारवार शहरातील पावसाचे व सांडपाणी अरबी समुद्राकडे वाहून जाण्यासाठी वाट करून देत न थकता अद्यापही ताठ मानेने उभे ठाकलेला लंडन ब्रिज आता इतिहासजमा होणार आहे. मुंबईहून गोवा राज्याच्या किनारपट्टीहून मंगळूरकडे जाणाऱया राष्ट्रीय हमरस्ता क्रं. 66 च्या रुंदीकरणाचे काम हाती घेतले आहे. या रुंदीकरणामुळे झाडे, घरे, प्रार्थना मंदिरे शेतजमिनीवर पाणी सोडावे लागले आहे. त्याचबरोबर किनारपट्टीवरील काही ऐतिहासिक स्थळांना मुकावे लागले आहे.
कारवार तालुक्यात रस्ता रुंदीकरणामुळे येथून पाच ते सहा किलोमीटर अंतरावरील सदाशिवगड किल्ल्याच्या पश्चिमेकडील भाग यापूर्वीच उद्ध्वस्त केला आहे. काळीनदी व अरबी समुद्राच्या संगमाजवळ वसलेला हा किल्ला शिवाजी महाराजांच्या राजवटीपूर्वीच बांधला आहे. हे खरे असले तरी या किल्ल्यावरील दुर्गादेवीचे दर्शन शिवाजी महाराजांनी दोन वेळा घेतल्याचा उल्लेख इतिहासात आढळून आल्याने या किल्ल्याशी येथील नागरिकांचे भावनिक संबंध जोडले गेले आहेत.
किल्ल्यानंतर आता लंडन ब्रिज
सदाशिवगड किल्ल्यानंतर आता रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली येथील लंडन ब्रिज इतिहास जमा होणार आहे. हा पूल कोने नाल्यावर ब्रिटिशांनी दीडशे वर्षापूर्वी उभारला होता. या पुलामुळे कारवार नगर, कारवार बंदराशी आणि अंकोला तालुक्याशी जोडले गेले होते, असे सांगितले जाते. तथापि ब्रिटिश कलेक्टर न्यायाधीशाचे बंगले कोने नाल्याच्या पलीकडच्या टेकडीवर होते. तसेच कारवार बंदरही कोने नाल्याच्या पलीकडे आहे. सरकारी अधिकाऱयांच्या बंगल्यांना व बंदराला येणे जाणे सोयिस्कर व्हावे म्हणून ब्रिटिशांनी तत्कालीन काळातील प्रगत तंत्रज्ञान वापरून लंडन ब्रिजची निर्मिती केली, असा उल्लेख कॅनरा गॅझेटीयरमध्ये आढळून येतो.
ब्रिज नव्हे कारवारचे प्रवेशद्वारच
लंडन ब्रिज कारवार नगराची वेस किंवा प्रवेशद्वार मानले जात असल्यामुळे येथील समुद्रकिनाऱयांची सीमा लंडन ब्रिजपासून सुरू होते. आता रस्ता रुंदीकरणामुळे दक्षिणेला तयार करण्यात आलेल्या बोगद्याना आणि उत्तरेला तयार करण्यात आलेल्या प्लायओव्हरला (आरटीओ ऑफिसपर्यंत) जोडण्यासाठी कोनेनाल्यावर नवीन पूल तयार करण्यात आल्याने लंडन पूल पाडण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.
दीडशे वर्षानंतरही मजबूत
हा ब्रिज अद्याप मजबूत आहे. ब्रिज बांधण्यासाठी आलेल्या मेटलला गंज आलेला नाही. राष्ट्रीय हमरस्ता खात्याच्या प्रमाणपत्रानुसार ब्रिज अद्यापही वापरासाठी धीट आहे. ही निश्चितही दखल घेण्याजोगी बाब आहे.