अर्धनग्न अवस्थेत अरबी समुद्रात उतरून आपल्या समस्या सरकारच्या नजरेस आणण्याचा प्रयत्न
प्रतिनिधी / कारवार
सरकारी ठेकेदारांच्या समस्यांकडे सरकार आणि लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी ठेकेदारांनी अर्धनग्न अवस्थेत मोर्चा काढला. या मोर्चात सहभागी झालेल्या ठेकेदारांनी काही वेळ अरबी समुद्रात उतरून आपल्या व्यथा सरकार तसेच लोकप्रतिनिधींच्या नजरेस आणण्याचा प्रयत्न केला. मोर्चाचे आयोजन कारवार तालुका नोंदणीकृत ठेकेदार संघटनेतर्फे करण्यात आले होते. संघटनेचे आणि जनशक्ती मंचचे अध्यक्ष माधव नाईक यांनी काही दिवसांपूर्वी वेगवेगळय़ा कारणांमुळे अडचणीत सापडलेल्या सरकारी ठेकेदारांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आगळय़ा वेगळय़ा पद्धतीने आंदोलन छेडण्यात येईल, अशी माहिती पत्रकार परिषद घेऊन दिली होती. तथापि पत्रकार परिषदेच्यावेळी आंदोलनाचा तपशील देण्यास नकार दिला होता. त्यामुळे या आंदोलनाबद्दल कारवार तालुकावासियांमध्ये उत्सुकता लागली होती. कारवार तालुक्यातील सरकारी ठेकेदार येथील मित्र समाज मैदानावर जमा हाऊन अर्धनग्नावस्थेत मित्र समाज मैदानापासून मोर्चाला सुरुवात करण्यात आली. ठेकेदारांनी ‘भ्रष्टाचार घालवा आणि ठेकेदारांना वाचवा’ ‘पॅकेज सिस्टिम नको, लोकप्रतिनिधींनो ठेकेदारांच्या समस्या समजून घ्या, कामे पूर्ण होताच बिले द्या, आदी आशयांचे फलक हातात धरले होते.
निदर्शने मोर्चा कारवार शहराच्या मुख्य रस्त्यावरून जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. तेथे घोषणाबाजी करून ठेकेदारांनी आपल्या समस्यांकडे संबंधीतांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
राज्यपालांना निवेदन
त्यानंतर ठेकेदारांच्या संघटनेतर्फे जिल्हाधिकाऱयांच्याद्वारे राज्यपालांना निवेदन देण्यात आले. निवेदनात असे म्हटले आहे की, सरकारने हाती घेतलेल्या अभिवृद्धी कामामध्ये ठेकेदार महत्त्वाची भूमिका बजावतात. ठकेदार टेंडरद्वारे सरकारी कामे पदरात पाडून घेऊन सदर कामे वेळेत पूर्ण करतात. तथापि कामे पूर्ण झाल्यानंतर कामांची बिले पदरात पाडून घेण्यासाठी ठेकेदारांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. सर्वत्र टक्केवारीचे व्यवहार सुरू आहेत. कामांची बिले वेळेत न मिळाल्याने कर्ज घेऊन ठकेदारी करणाऱयांची आर्थिक फरफट होत आहे. त्याकरिता झालेल्या कामाची बिले लवकर द्यावीत.
अरबी समुद्रात निदर्शने
ठेकेदारांनी रविंद्रनाथ टागोर समुद्र किनाऱयाकडे आपला मोर्चा वळविला व समुद्रात काही वेळ थांबून आपल्याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. निदर्शन मोर्चाचे नेतृत्त्व संघटनेचे अध्यक्ष माधव नाईक यांनी केले. आंदोलनात संतोष सैल, विजय देसाई, प्रकाश गावकर, सतीश नाईक, अनिलकुमार मालसेकर, उदय नाईक, रवी मांजरेकर, शशीकांत नाईक, कृष्णानंद नाईक, सुमीत असनोटीकर, राजेश शेट सहभागी झाले होते.
दगडाच्या खाणी निश्चित करा
विविध बांधकामांसाठी आवश्यक असलेल्या वाळू, माती, दगड, एम. सॅण्ड आदी साहित्य मिळविताना अडचणी येत आहेत. यासाठी दगडांच्या खाणी निश्चित कराव्यात, अशी मागणी करून जिल्हय़ात वर्षातील अनेक महिने पाऊस पडतो. त्याकरिता सरकारी कामांचा कालावधी वाढवून द्यावा. दोन किंवा तीन कामे एकत्र करून देण्यात येणारी पॅकेज पद्धत रद्द करावी. इंजिनिअरची नेमणूक करावी. कारवार जिल्हय़ासाठी स्वतंत्र दरपत्रक जाहीर करावे आणि डिझेलचे दर कमी करावेत, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.