प्रतिनिधी/ कारवार
जिल्हय़ातील दोन टप्प्यातील ग्राम पंचायत निवडणूक पर्वाला दि. 7 पासून सुरुवात होणार असल्याने येथील राजकीय हालचालींना वेग घेतला आहे. जिल्हय़ातील किनारपट्टीवरील कारवार, अंकोला, कुमठा, होन्नावर आणि भटकळ होन्नावर विधानसभा मतदार संघात समावेश होत असलेल्या कारवार, अंकोला, कुमठा, होन्नावर आणि भटकळ अशा पाच तालुक्यातील ग्राम पंचातीसाठी 22 डिसेंबर रोजी निवडणूक होणार आहे. तर जिल्हय़ातील घाटमाथ्यावरील हल्याळ-जोयडा यल्लापूर-मुंदगोड आणि सिद्धापूर-शिरसी अशा तीन विधानसभा मतदार संघात समावेश होत असलेल्या जोयडा, हल्याळ, दांडेली, यल्लापूर, मुंदगोड, सिद्धापूर आणि शिरसी अशा सात तालुक्यातील ग्राम पंचायतीसाठी 26 डिसेंबर रोजी निवडणूक होणार आहे.
लढत भाजप आणि काँग्रेस दरम्यान
ग्राम पंचायतची निवडणूक राजकीय पक्षाच्या चिन्हांच्या आधारावर होणार नाही. हे खरे असले तरी निवडणुकांच्या रिंगणात उतरणारे अधिक तर उमेदवार कोणत्या ना कोणत्या राजकीय पक्षाचे समर्थक असणार हे ही तितकेच खरे आहे. ग्राम पंचायत निवडणुकीद्वारे राज्यातील सत्तारुढ पक्ष भाजप आणि काँग्रेस पक्षाला जिल्हय़ातील ग्रामीण भागातील आपले वर्चस्व आणि पकड सिद्ध करण्यची संधीच म्हणावी लागेल, या व्यतिरिक्त निजदचे समर्थक आणि अनेक अपक्ष उमेदवार या निवडणुकीद्वारे आपले नशिब आजमावणार आहेत. शेवटी जिल्हय़ातील ग्राम पंचायत निवडणुकीचा सामना भाजप आणि काँग्रेस पक्षात रंगणार असे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
भाजपची बाजू वरचढ
निवडणुकीत बाजी कोण मारणार हे निकालानंतरच स्पष्ट होणार हे खरे असले तरी निवडणुकीच्या लढाईच्या बाबतीत भाजपची बाजू वरचढ आहे. असे म्हणायला हरकत नाही. जिल्हय़ातील भाजपचा एक खासदार, 5 आमदार आणि एक विधान परिषद सदस्य आहे. खासदार अनंतकुमार आणि विधानसभा सदस्य विश्वेश्वर हेगडे निवडणुकीच्या प्रचारात स्वत:ला झोकून देणार का, हे येणारा काळ ठरविणार आहे. तथापि जिल्हय़ातील जास्तीत जास्त ग्राम पंचायतीवर भाजपचा झेंडा फडकाविण्याची जबाबदारी जिल्हा पालकमंत्री शिवराम हेब्बार यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
काँग्रेसची मदार देशपांडे आणि घोटणेकर यांच्यावर
भाजपच्या उलट काँग्रेसची मदार माजी मंत्री आणि हल्याळचे आमदार आर. व्ही. देशपांडे आणि विधानपरिषद सदस्य श्रीकांत घोटणेकर यांच्यावर आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी हल्याळ-जोयडा आणि कुमठा-होन्नावर या दोन विधानसभा मतदार संघातील ग्राम पंचायतीची जबाबदारी आर. व्ही. देशपांडे यांच्यावर सोपविली आहे. मुंदगोड यल्लापूर विधानसभा मतदार संघातील ग्राम पंचायत निवडणुकीची जबाबदारी घोटणेकर यांच्यावर सोपविली आहे. कारवार- अंकोला विधानसभा मतदार संघातील ग्रा. पं. निवडणुकीची जबाबदारी कारवारचे माजी आमदार सतीश सैल यांच्यावर, भटकळ विधानसभा मतदार संघातील ग्रा. पं. निवडणुकीची जबाबदारी भटकळचे माजी आमदार मंकाळू वैद्य यांच्यावर आणि सिद्धापूर-शिरसी विधानसभा मतदार संघातील ग्राम पंचायतची जबाबदारी हावेरी जिल्हय़ातील माजी मंत्री ए. एम. हिडॅसगिरी यांच्यावर सोपविली आहे. तथापि कुमठाच्या माजी आमदार शारदा शेट्टी यांच्या खांद्यावर कोणतीही जबाबदारी सोपविण्यात न आल्याने वेगवेगळे तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत.
अधिक ग्राम पंचायतींवर झेंडा फडकविण्यासाठी भाजप प्रयत्नशील
जिल्हय़ात गेल्या एक-दीड वर्षात झालेल्या निवडणुकांमध्ये किंवा अलिकडेच झालेल्या पश्चिम पदवीधर मतदार संघात आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदाधिकारी निवडणुकीत भाजपने काँग्रेसवर कमालीची मात केली आहे. त्यामुळे भाजपचा आत्मविश्वास उंचावणे साहजिक आहे. यापूर्वी जिल्हय़ात झालेल्या ग्राम पंचायत निवडणुकीत भाजपला अपेक्षित यश मिळाले नव्हते आणि म्हणूनच आगामी ग्राम पंचायत निवडणुकीत जिल्हय़ातील अधिकाधिक ग्राम पंचायतींवर झेंडा फडकविण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे. त्यादृष्टीने भाजपने नियोजन केले आहे. ग्रा. पं. पातळीवर निवडणूक लढविण्यासाठी भाजपचे पॅनेल तयार झाले आहेत. इतकी वर्षे ग्राम पंचायतीवर काँग्रेसचे असलेले वर्चस्व हटविण्यात भाजपला यश येणार का? की पुन्हा काँग्रेसच बाजी मारणार हे पाहण्यासाठी काही वेळ थांबावे लागेल.