प्रतिनिधी/ कारवार
कारवार-पडील-बेंगळूर रेल्वेच्या वेळापत्रकात बदल केल्यास रेल्वे रोको करून निदर्शने करण्याचा इशारा कारवार रेल्वे वापर हितरक्षण समितीचे अध्यक्ष जगदीश बिरकोडीकर आणि उपाध्यक्ष वजन शक्ती मंचचे अध्यक्ष माधव नायक यांनी दिला आहे.
याबद्दल अधिक माहिती देताना माधव नायक पुढे म्हणाले. जिल्हय़ाच्या किनारपट्टीवासियांसाठी अतिशय सोयीची आणि अनुकूल बनून राहिलेल्या कारवार पडील-बेंगळूर रेल्वेच्या वेळापत्रकात बदल करण्याचा विचार सुरू आहे, अशी माहिती उपलब्ध झाली आहे. अस्तित्वात असलेले रेल्वेचे वेळापत्रक कारवार, अंकोला, कुमठा, होन्नावर आणि भटकळ तालुकावासियांसाठी अतिशय सोयीचे आणि या वेळापत्रकाशी किनारपट्टीवासियांनी जुळवून घेतले आहेत. असे असतानाही कोणत्याही प्रकारचे सबळ कारण नसताना अचानक रेल्वेच्या वेळापत्रकात बदल केल्यास जनतेची सोय व्हायच्या ऐवजी गैरसोयच अधिक होणार आहे. आणि म्हणूनच वेळाप्रत्रकात बदल न करण्याची विनंती माधव नायक यांनी रेल्वे खात्याकडे केली आहे. तरीसुद्धा वेळापत्रकात बदल केल्यास रेल्वे रोको करून जोरदार निदर्शने करण्यात येतील. उडुपी जिल्हय़ातील कुंदापूर येथील रेल्वे वापर हितरक्षण समितीनेही या विरुद्ध आवाज उठविण्यास सुरू केली आहे. आम्ही पण कुंदापूर हितरक्षण समितीला सोय देऊ, असे नायक यांनी स्पष्ट केले आहे.
कारवार-पडील-बेंगळूर रेल्वे येथून संध्याकाळी सुटते आणि सकाळी बेंगळूरला पोहोचते. त्यामुळे बेंगळुरात कामे वेळेत करणे शक्य होते. रेल्वेच्या वेळापत्रकात आणि मार्गात बदल केल्यास रेल्वे प्रवाशांचे वेळापत्रक कोलमडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.