निराश्रितांनी बसस्थानकातच मांडले ठाण : कचरा साचल्याने दुर्गंधी : प्रवेशद्वारावर मद्याच्या बाटल्या : सुरक्षा रक्षक नेमण्याची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
रेल्वे स्टेशनसमोरील कारवार बसस्थानकाचा विकास स्मार्ट सिटी योजनेंतर्गत करण्यात आला आहे. मात्र बसस्थानक उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. उद्घाटनासाठी मुहूर्त मिळाला नसल्याने बसस्थानकाचा ताबा निराश्रित आणि बेघरांनी घेतला असून सर्वत्र घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. उद्घाटनापूर्वीच बसस्थानकाची दुरवस्था झाली असल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
कारवार बसस्थानकाचा परिसर मोठा असून कॅन्टोन्मेंट अखत्यारित येतो. विकासाअभावी या बसस्थानकाचा दुरूपयोग केला जात होता. प्रवाशांसाठी व्यवस्थित आसन व्यवस्था नव्हती. तसेच प्रवाशांना ऊन-पावसात थांबण्यासाठी निवारा नव्हता. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असे. अलिकडेच रेल्वेस्थानकाचा विकास करण्याचे काम हाती घेण्यात आल्याने स्मार्ट सिटी योजनेंतर्गत या बसस्थानकाचा विकास करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार स्मार्ट बसस्थानक बनविण्यात आले आहे.
बसस्थानकाचे काम पूर्ण होऊनही लोकार्पण नाही
या परिसरात व्यापारी गाळे, परिवहन मंडळाचे कार्यालय, पोलीस चौकी, प्रवाशांसाठी आसन सुविधा तसेच निवारा अशा विविध सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. सदर बसस्थानकाचे काम पूर्ण होऊन दोन महिने उलटले. पण अद्यापही लोकार्पण करण्यात आले नाही. मात्र बसस्थानकाचा वापर सुरू झाला आहे. बसस्थानकावर प्रवाशांपेक्षा निराश्रित आणि बेघर नागरिकांचा वावर वाढला आहे. व्यवस्थित निवारा तसेच आवश्यक सुविधा असल्याने निराश्रितांनी बसथांब्यावर ठाण मांडले आहे.
त्यामुळे बसस्थानक की धर्मशाळा असा मुद्दा उपस्थित झाला आहे. तसेच उद्घाटनापूर्वीच बसथांब्याच्या परिसरात अस्वच्छता निर्माण झाली असून कचरा साचला आहे. बसस्थानकाच्या प्रवेशद्वारावर मद्याच्या बाटल्या व कचरा टाकण्यात आला आहे. त्यामुळे स्मार्ट बसस्थानकाची दुरवस्था झाल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. या बसस्थानकाचे रितसर उद्घाटन कधी होणार? असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे. बसस्थानकाच्या व प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रवेशद्वारावर गेट बसवून सुरक्षा रक्षक नेमावेत, अशी मागणी होत आहे.