प्रतिनिधी/ भुईंज
कारी (ता. सातारा) येथून बेपत्ता झालेल्या विवाहितेचा मृतदेह (आसले ता. वाई) येथील उसाच्या शेतात आढळून आल्यानंतर चोवीस तासातच या महिलेचा खून झाल्याचे उघड झाले आहे. महिलेच्या खूनाचा गुन्हा भुईंज पोलिसांत दाखल झाला असून नातेवाईकांनी संशय व्यक्त केलेल्या संशयितांचा शोध सुरु आहे. व्याजवाडी येथील या संशयितांने पोलिसांना चकवा दिला असून पोलिसांचे विशेष पथक त्याच्या तपासासाठी बुधवारी दिवसभर कार्यरत होते. रात्री उशिरापर्यंत संशयित पोलिसांच्या हाती लागला नव्हता. दरम्यान, संशयिताला ताब्यात घेतल्यानंतर विवाहितेचा खून नेमक्या कोणत्या कारणामुळे झाला हे उघड होईल.
याबाबत भुईंज पोलीस स्टेशनचे सपोनि आशिष कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिलेली माहिती अशी की, दि. 31 जुलै रोजी रात्री दहा वाजता सातारा येथून बेपत्ता झालेल्या सौ. संध्या विजय शिंदे (वय 34 रा. कारी ता. जि. सातारा) या बेपत्ता झाल्याची नोंद सातारा शहर पोलीस स्टेशनला दाखल झाली होती. दरम्यान, मंगळवार दि. 3 ऑगष्ट रोजी सायंकाळी पाच वाजता भुईंज पोलीस स्टेशनच्या हद्दीत आसले (ता. वाई) येथील उसाच्या शेतात एक मृतदेह आढळुन आला. सदर मृतदेहाची प्राथमिक तपासणी केल्यानंतर त्यासोबत सापडलेले आधारकार्ड व इतर कागदपत्रे यांची पडताळणी करून नातेवाईकांना बोलवण्यात आले. त्यानंतर सदर मृतदेह हा सौ. संध्या विजय शिंदे हिचा असल्याचे खात्री झाल्यानंतर पोलिसांनी शवविच्छेदनासाठी सातारा येथे पाठविला.
मृतदेह व बांधलेले हात तोंडावरील खुणा यावरून हा खूनच असावा असा प्राथमिक अंदाज बांधून सपोनि कांबळे यांनी घटनास्थळापासून तपासाला सुरुवात केली आणि मोबाईल लोकेशनच्या आधारावर संशयितापर्यंत पोहचण्यासाठी विशेष पथक रवाना केले. बुधवारी सकाळी कारी (ता. सातारा) येथे अंत्यसंस्कार झाल्यानंतर नातेवाईक यांनी भुईंज पोलीस ठाण्यात येवून सौ. संध्या शिंदे यांचा खून नितीन आनंदराव गोळे (रा. व्याजवाडी ता. वाई) यांनीच केला असल्याची फिर्याद दिली व तातडीने संशयित आरोपीला अटक करा अशी मागणी केली.
यावरून भुईज पोलिसांनी संशयित आरोपी नितीन गोळे याला ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न चालू केले. परंतु बुधवारी रात्री उशिरापर्यंत तो सापडला नाही. मयत संध्या हि पुसेगाव येथील एका केटरिंग व्यवसायात कामाला जाते. तिच्या समवेत सातारा येथील अन्य हि महिला असतात तर नितीन गोळे हा हि या व्यवसायाशी संबंधित असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मात्र खूनाचे नेमके कारण स्पष्ट होवू शकले नाही.
घटनास्थळी अप्पर पोलीस अधिक्षक धिरज पाटील, वाईच्या उपविभागीय पोलीस अधिकारी शितल जाणवे खराडे, स्थानिक गुन्हे अन्वेशन विभागाचे सपोनि रमेश गर्जे यांनी भेट देवून सपोनि आशिष कांबळे यांना तपासासाठी सूचना केल्या. यावरून पीएसआय रत्नदीप भंडारे, निवास मोरे, पोलीस हवालदार विकास गंगावणे, पोलीस हवालदार उत्तमराव दबडे, सुधीर बनकर, संतोष सपकाळ, संतोष पवार, रवि वाघमारे, सचिन ससाणे, पोलीस कॉन्स्टेबल रविराज वर्णेकर, प्रसाद दुदुस्कर, तुकाराम पवार, अतुल आवळे, शिवाजी तोडरमल, आनंदराव भोसले, बापुराव धायगुड़े, प्रियांका कदम, दिपाली गिरीगोसावी आदी तपास करीत आहेत.
बारा तास मृतदेहाची विटंबना
भुईंज प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी एम.बी.बी.एस डॉक्टर नसल्याने येथे शवविच्छेदन केले जात नाही. त्यामुळे रात्री 11 वाजता मृतदेह सातारा येथे सिव्हील हॉस्पीटल येथे नातेवाईकांना घेवून जावे लागले. तेथे सकाळी 11 वाजता मृतदेहाचे शवविच्छेदन झाले. नातेवाईकांना तब्बल 12 तास शवविच्छेदनासाठी प्रतिक्षा करावी लागली. नातेवाईकांचा मानसिक त्रास व मृतदेहाची विटंबना थांबणार केव्हा. हे नेहमीचे चित्र बदलणार केव्हा. जिल्हा प्रशासनाने गांभिर्याने याकडे पहावे अन्यथा एक दिवस जनउद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.