ध्यानीमनी नसताना घेतला जगाचा निरोप : अनेकांच्या मनात त्यांच्या सहवासातील आठवणी जाग्या
मनीषा सुभेदार / बेळगाव
ज्याच्या उपस्थितीने अनेकांना धडकी भरते तो खरा पत्रकार आणि ज्याच्या भोवती सतत लोकांचा गोतावळा जमतो तो अजातशत्रू असे मानले गेले तर अशोक याळगी हे व्यक्तिमत्त्व या चौकटीत अचूक बसते. पत्रकार म्हणून कार्यरत असताना सर्चलाईट या विशेष वृत्तातून त्यांनी अनेक प्रश्नांना व अन्यायांना वाचा फोडली. त्यामुळे पत्रकारितेच्या काळात त्यांची उपस्थिती ही अनेकांना धडकी भरविणारी असे. मात्र हेच याळगी जेव्हा लोकमान्य ग्रंथालयाचे कार्याध्यक्ष म्हणून कार्यरत राहिले तेव्हा त्यांच्या भोवती अखंड माणसांचा गोतावळा असायचा. गुरुवारी ध्यानीमनी नसताना त्यांनी या जगाचा निरोप घेतला आणि अनेकांच्या मनात त्यांच्या सहवासातील आठवणी जाग्या झाल्या.
बेळगावच्या सांस्कृतिक, साहित्यिक क्षेत्रात अलीकडच्या काळात याळगी यांनी बरेच काम केले. परंतु त्यांची खरी व मूळ ओळख ही पत्रकार अशीच राहिली. तरुण भारतचे संस्थापक बाबुराव ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी तरुण भारतमध्ये पत्रकारिता सुरू केली. विद्यार्थी दशेपासून त्यांचे तरुण भारतमध्ये येणे-जाणे होते. दहावीत असतानाच त्यांनी सीमा आंदोलनात भाग घेतला. परिणामी त्यांच्या दहावीचा निकाल त्यांना तुरूंगातच कळला.
पुढे मराठी विषयामध्ये त्यांनी एमएची पदवी घेतली. आरपीडीमध्ये प्राध्यापक म्हणून रुजू व्हावे हा विचार सुरू असतानाच काकांच्या लेथ मशीनच्या कारखान्यात ते रुजू झाले. कानावर मशीनचा आवाज धडधड कोसळत असताना त्यांच्या मनात मात्र साहित्याचे अंकुर फुटत होते. त्यामुळे याच काळात त्यांनी नियतकालीक काढण्याचा प्रयोग करून पाहिला. गोव्याहून निघणाऱया ‘मांडवी’ या मासिकाचे सहसंपादक म्हणूनही त्यांनी काम केले होते.
अनेक सामाजिक उपक्रम राबविले
मात्र खऱया अर्थाने ते मनापासून रमले तरुण भारतमध्ये. याळगी यांनी तरुण भारतमध्ये दीर्घकाळ पत्रकारिता केली. याच माध्यमातून त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबविले. तरुण भारतची अक्षरयात्रा पुरवणी समृद्ध करण्यात त्यांचा सहभाग महत्त्वाचा होता. या पुरवणीसाठी अनेक नामवंत लेखकांना त्यांनी लिहिते केले. त्यामुळे महाराष्ट्रातील साहित्यिक वर्तुळात याळगी परिचित होते. दिवाळी अंकाबरोबर लेखकांना बेळगावचे मांडे भेट म्हणून देण्याची त्यांची कल्पना लेखकांना भावली. पत्रकार म्हणून काम करतानाच अनेक सामाजिक उपक्रम त्यांनी राबविले. अधिकाऱयांशी चर्चा, जनावरांसाठी लसीकरण, महिला सक्षमीकरणासाठीचे उपक्रम ही त्यातील काही वानगी दाखल उदाहरणे.
तरुण भारतमध्ये ‘मायादास’ हे प्रश्नोत्तरांचे सदर चालवून त्यांनी लोकप्रिय केले. या शिवाय काटेरी मखमल, सर्चलाईट अशी सदरेही त्यांनी चालविली. आपल्या लेखणीतून त्यांनी अनेकदा अनेकांवर टीका केली. टपल्या मारल्या. परंतु ती व्यक्ती कधीच त्यांची शत्रू झाली नाही, हे त्यांच्या लिखाणाचे विशेष होय.
लोकमान्य ग्रंथालयाचा लक्षणीय विस्तार
तरुण भारतमधून निवृत्त झाल्यानंतर तरुण भारतचे समूहप्रमुख व सल्लागार संपादक किरण ठाकुर यांनी अशोक याळगी यांच्यावर लोकमान्य ग्रंथालयाची जबाबदारी सोपविली. बेळगावचेच लोकप्रिय कवी व अकाली निर्वतलेले अविनाश ओगले यांच्या सोबतीने त्यांनी 111 पुस्तकांच्या पुंजीवर हे लोकमान्य ग्रंथालय सुरू केले. दहा वर्षांत या ग्रंथालयाचा लक्षणीय विस्तार करण्यास त्यांचे श्रम कारणीभूत ठरले.
लोकमान्य ग्रंथालय हे केवळ ग्रंथालय न राहता सांस्कृतिक चळवळीचे केंद्र व्हावे, ही किरण ठाकुर यांची अपेक्षा त्यांनी सर्वार्थाने पूर्ण केली. म्हणूनच तर ग्रंथालयातर्फे इंदिरा संत व्याख्यानमाला, जी. ए. कुलकर्णी स्मृती दालन, कमल देसाई स्मृती दालन सुरू करण्यात त्यांनी पुढाकार घेतला. लोकमान्य ग्रंथालयाचा विस्तार करण्यासाठी किरण ठाकुर यांनी दिलेले स्वातंत्र्य महत्त्वाचे आहे. याची कृतज्ञ जाणीव याळगी यांना नेहमीच होती. लोकमान्य ग्रंथालय हे त्यांनी आपले अपत्य मानले. त्यामुळे अगदी अलीकडच्या काळात सुरू होऊनसुद्धा या ग्रंथालयाची दखल महाराष्ट्रानेही घेतली.
‘संस्कारक्षम पुस्तके, अल्पदरात-घराघरात’ हा अविनाश ओगले समवेत सुरू केलेला उपक्रम विलक्षण गाजला. प्रकाशकांकडून पुस्तके आणून अल्पदरात रसिकांना उपलब्ध करून दिल्याने पुस्तकांची खरेदी तर झालीच. शिवाय वाचन संस्कृती निश्चित वाढीला लागली.
‘घरपोच पुस्तक योजना’
लोकमान्य ग्रंथालयाच्या माध्यमातूनच बाल वाचक योजना, गप्पांगण, बुलक हे उपक्रम सुरू झाले. वाचकांना नवीन पुस्तके हाताळण्यास मिळावी म्हणून त्यांनी त्याचे प्रदर्शन भरविण्यास प्रारंभ केला. अक्षरधन वाचन संस्कृती चळवळ सुरू केली. मात्र यातील सर्वाधिक नावाजला गेला तो उपक्रम म्हणजे ‘घरपोच पुस्तक योजना’. ज्ये÷ किंवा वृद्ध नागरिकांना ग्रंथालयात येणे अशक्मय होते. नोकरदारांचीही गैरसोय होते. हे जाणून त्यांनी घरपोच पुस्तक पोहोचविण्याची योजना सुरू केली आणि बेळगावातील वाचन चळवळ वृEिद्धगत झाली.
सीमाप्रश्न सुटावा ही त्यांची तळमळ
ग्रंथालयाबरोबरच अशोक याळगी वरेरकर नाटय़संघ, वाङ्मय चर्चा मंडळ, सीमाभागातील साहित्य संमेलने यामध्ये सक्रिय राहिले. सीमाप्रश्न सुटावा ही त्यांची तळमळ नेहमीच होती. पत्रकारितेत सक्रिय नसले तरी अनेक पत्रकारांना त्यांनी तरुण भारतमध्ये आणले आणि प्रोत्साहन दिले. मराठी शुद्ध भाषेबद्दल ते नेहमीच आग्रही राहिले. सीमाप्रश्नाची जाण असणारे, असंख्य साहित्यिकांशी स्नेह असणारे आपल्या मिश्किल बोलण्याने हास्य फुलविणारे, पुस्तकांविषयी कमालीची आस्था असणारे आणि अनेक संस्थांचे आधारवड असणारे अशोक याळगी यांच्या निधनाने खऱयाअर्थाने असंख्य संस्था पोरक्मया झाल्या आहेत. या सर्व संस्थांची आश्वासक वाटचाल हीच त्यांना आदरांजली ठरणार आहे.