प्रतिनिधी/ बेळगाव
सार्वजनिक शिक्षण विभागातर्फे दहावी शिक्षकांसाठी विषयनिहाय कार्यशाळेचे आयोजन करण्यात येत असून सध्याच्या परिस्थितीत कार्यशाळा शिक्षकांसाठी कामाचा व्याप वाढविणारी ठरत आहे. 1 जानेवारीपासून दहावीच्या वर्गांना प्रारंभ झाला असून यामुळे शिक्षक व्यस्त आहेत. मात्र, जानेवारी महिन्यात प्रत्येक विषयाची एक कार्यशाळा याप्रमाणे कार्यशाळांचे आयोजन करण्यात येत असून आता कार्यशाळेची गरज काय, असा प्रश्न निर्माण होत आहे. शैक्षणिक कामकाजाचे दिवस कमी असल्याने प्रत्येक दिवस महत्त्वाचा असून सध्या तरी दहावी शिक्षकांसाठी कार्यशाळा म्हणजे असून अडचण नसून खोळंबा आहे.
दरवर्षी दहावी शिक्षकांसाठी कार्यशाळा आयोजित केल्या जातात. संपन्मूल व्यक्तीच्या माध्यमातून दहावी शिक्षकांसाठी मार्गदर्शन केले जाते. यामुळे विद्यार्थ्यांना अध्यापन करताना शिक्षकांना त्याचा नक्कीच लाभ होतो. मात्र, सध्याच्या परिस्थितीत नुकतेच दहावीचे वर्ग सुरू झाले असून दुसरी कार्यशाळा जानेवारी महिन्यात आयोजित करण्यात येत आहे. डिसेंबर महिन्यात प्रत्येक विषयनिहाय एक-एक कार्यशाळा पार पडल्या आहेत. नियोजित वेळापत्रकाप्रमाणे सध्या दुसरी कार्यशाळा होत आहे. मात्र, यामुळे शिक्षकांना विद्यार्थ्यांना शिकवायचे की कार्यशाळेला उपस्थित राहायचे, असा प्रश्न पडला आहे.
कार्यशाळांना उपस्थिती सक्तीची असल्याने शिक्षकांना कार्यशाळेला हजेरी लावावीच लागते. मात्र, सध्या सुरू झालेले दहावीचे वर्ग व इतर इयत्तांच्या विद्यागम प्रणालीची अंमलबजावणी करताना शिक्षकांची संख्या अपुरी पडत आहे. सामाजिक अंतर राखण्याच्यादृष्टीने इयत्तानिहाय वर्ग विभागण्यात आले असल्याने शिक्षकांचा व्याप वाढला आहे. त्यातच कार्यशाळांचे आयोजन करण्यात येत असून सध्याच्या परिस्थितीत कार्यशाळेचा भार कशाला, असा सूर व्यक्त होत आहे. अर्थात कार्यशाळा लाभदायक ठरतात. मात्र, सध्याच्या परिस्थितीत अभ्यासक्रम पूर्ण करणे व परीक्षा यामधील वेळ कमी असल्याने कार्यशाळेच्या आयोजनाबाबत विचार होणे गरजेचे आहे.