जि. प. सदस्य उत्तम पांढरे यांचे पुत्र : महामार्गावर वेत्ये येथील घटना : ताबा सुटल्याने कार रस्त्याकडेला कोसळली
प्रतिनिधी / सावंतवाडी:
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर वेत्ये-मळगाव सीमेवर बलेनो कार रस्त्याच्या कडेला दहा फूट खाली कोसळून झालेल्या अपघातात निरवडे-कोनापाल येथील कारचालक उदय उत्तम पांढरे (28) जागीच ठार झाला. सकाळी साडेअकराच्या सुमारास झालेला हा अपघात कारचालकाचा ताबा सुटल्यामुळे झाला. मृत उदय हा तळवडे जि. प. सदस्य उत्तम पांढरे यांचा एकुलता एक पुत्र होता. त्याचा निरवडे येथे प्लास्टिकचा कारखाना होता.
कारवरील नियंत्रण सुटल्यानंतर ती रस्त्याकडेला असलेल्या आकेशीच्या झाडाला आदळून थांबली. अपघातात कारच्या बॉडीचे तुकडे इतस्त: विखुरले होते. उदय हा मळगावहून बांद्याच्या दिशेने जात होता. अपघातानंतर वेत्ये, मळगावच्या ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमीला सावंतवाडीच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणले. परंतु तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.
उदय याने सकाळी मळगाव येथे हॉटेलमध्ये नाश्ता केला. त्यानंतर कारमधून तो बांद्याच्या दिशेने जात होता. तो स्वत: कार (एमच-07/एजी-6222) चालवत होता. मळगाव-वेत्ये सीमेवर मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर त्याचे कारवरील नियंत्रण सुटून कार रस्त्याकडेला गेली. कार प्रथम आकेशीच्या झाडाला आदळत नंतर पुढे जाऊन थांबली.
अपघातानंतर मळगाव, वेत्ये ग्रामस्थांनी धाव घेत उदय याला उपचारासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. परंतु तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाला. ही घटना समजताच नगराध्यक्ष संजू परब, शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, अशोक दळवी, पालिकेतील शिवसेना गटनेत्या अनारोजीन लोबो, शब्बीर मणियार, बळवंत कुडतरकर, अजय गोंधावळे, प्रमोद गावडे, महेश सारंग, मनोज नाईक, पंकज पेडणेकर, राजू परब, जितू गावकर, गुरू गावकर यांच्यासह सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली.
मुलाच्या अपघाती मृत्यूची बातमी समजताच उत्तम पांढरे यांना मोठा धक्का बसला. उपजिल्हा रुग्णालयात त्यांनी हंबरडा फोडला. उपस्थित कार्यकर्त्यांनाही यावेळी अश्रू आवरता आले नाहीत. अपघाताची माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला.
मृत उदय याचा निरवडे येथे प्लास्टिकचा कारखाना होता. तो वडिलांच्या व्यवसायातही हातभार लावत होता. त्याच्या अपघाती निधनाने पांढरे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.