माय-लेकराचा जागीच मृत्यू – परिसरातून होतेय हळहळ व्यक्त
वार्ताहर/ शिखरशिंगणापूर
शिंगणापूर येथील भवानी घाटातून नातेपुतेकडे जात असताना वाहनावरील नियंत्रण सुटल्याने डोंगरमाथ्यावरील पहिल्याच वळणात चारचाकी 400 फूट दरीत कोसळली असून यामध्ये आई-मुलगा जागीच ठार झाला आहे. सदर अपघाताची माहीती मिळताच शिंगणापूरच्या 30 तरुणांनी ट्रेकरच्या साहाय्याने मृतदेह बाहेर काढले. अपघातामध्ये आई-मुलगा जागीच ठार झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
नातेपुते पोलीस यंत्रणेकडून मिळालेली माहिती अशी की, थदाळे (ता. माण) येथील गजानन सर्जेराव वावरे (वय 53 वर्ष), त्यांच्या मातोश्री हिराबाई सर्जेराव वावरे (वय 83 वर्ष) हे सोमवारी थदाळे सहकारी सेवासोसायटी मतदानासाठी गावी आले होते. गावी एकरात्र मुक्काम करून मंगळवारी सकाळी परतीच्या प्रवासासाठी ते निघाले होते. शिंगणापूर नजीकच्या भवानी घाटात नातेपुतेकडे जात असताना वाहनावरील नियंत्रण सुटल्याने चारचाकी कार 400 फूट दरीत कोसळली. सदर अपघातात माय-लेकरे जागीच ठार झाली असून नातेपुते पोलीस यंत्रणेने मृतदेह ताब्यात घेऊन प्राथमिक आरोग्य केंद्र नातेपुते येथे शवविच्छेदनासाठी पाठविले आहेत.
शिंगणापूर तरुणांचे साहस
अपघात डोंगर माथ्यावरून दिसत होता. मात्र अपघात स्थळी जाणे खूप जिकिरीचे होते. मानवी साखळी करून तरुण कार्यकर्ते अपघात स्थळी पोहचले. ट्रेकर्सच्या साह्याने मानवी साखळी करूनच मायलेकरांचे मृतदेह बाहेर काढले. यामध्ये शंभू महादेव प्रतिष्टांनचे वीरभद्र कावडे, शिंगणापूर माजी उपसरपंच शंकर तांबवे, मिथून कर्चे, अक्षय शेंडे, अनिल कर्चे, अमोल राऊत, आनंद बडवे गुरुजी, विकास मदने हे आघाडीवर होते. त्यांना करचेपिंप्री (ता. माळशिरस) च्या तरुणांनी महत्त्वाची मदत केली. अपघातप्रसंगी मदत करणाऱया शिंगणापूर तरुणांच्या साहसाचे कौतुक होत आहे.