अर्जुना धरण कालव्याचे माळरानावर ठेवलेले पाईप वणव्यात खाक
वार्ताहर / राजापूर
तालुक्यातील हरळ गावी माळरानावर सोमवारी दुपारी वणवा लागला. या वणव्यामध्ये अर्जुना धरणाच्या कालव्यासाठी ठेवलेले पाईप जळून खाक झाल्याने कोटय़वधी रूपयांचे नुकसान झाले आहे.
हरळ गावातील माळरानावर सोमवारी दुपारी 2 च्या सुमारास अचानक वणवा लागला. दुपारची कडकडीत उन्हाची वेळ, सुकलेले गवत आणि वारा यामुळे काही वेळातच हा वणवा भडकला आणि संपूर्ण माळरान आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. या आगीत अर्जुना धरणाच्या कालव्यासाठी ठेवलेले कोटय़वधी रुपयांचे पाईपही जळून खाक झाले आहेत. अर्जुना नदीच्या खोऱयात अर्जुना मध्यम प्रकल्पाचे काम अनेक वर्षे चालू आहे. सद्यस्थितीत या प्रकल्पाच्या कालव्यांची कामे सुरू आहेत. कालव्यांमध्ये टाकण्यासाठी आणलेले मोठ-मोठे पाईप हरळ येथे माळरानावर ठेवण्यात आले होते. वणव्यात ते खाक झाल्याने मोठे नुकसान झाले आहे.