प्रतिनिधी / मुंबई
मानव स्वतःच्या स्वार्थासाठी पर्यावरणाचा ऱ्हास करत आहे. त्याचे परिणाम हवामान बदलातुन आपल्याला भोगावे लागत आहे. माणूस असेच जर निसर्ग ओरबडत राहिला तर पुढच्या पिढीला आपण काय देणार..त्यामुळे निसर्गाच्या शाश्वतेसाठी आता संवर्धनाची पाऊले उचलली पाहिजे असा संदेश काळाघोडा महोत्सवातील काही इंस्टोलेशनच्या कलाकृतीतून देण्यात आला. या वर्षी महोत्सवाची संकल्पना शाश्वता अशी आहे.काळाघोडा महोत्सवमध्ये गुरुवारी तरुणांची मोठी गर्दी उसळली होती. प्रवेशद्वाराजवळ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या रांगा लागल्या होत्या. फोटोशूट सेल्फी मध्ये तरुणाई मग्न होती. कालाघोडा चौकजवळ सप्तरंगी ओढणीची केलेली झुंबरसारखी कलाकृती छायाचित्रासाठी सर्वात लोकप्रिय ठरत होती.
समुद्री जैवविविधतेचे महत्त्व विशद करताना प्लॅस्टिक आणि कचरा त्यांच्या जीवावर बेतत आहे, अशी टेक्स्टाईल कलाकृती तयार करण्यात आली आहे. सेव्ह मरीन लाईफ असा संदेश ही कलाकृती देते. तर प्लॅस्टिक ही खूप मोठी समस्या बनत आहे. निसर्गासाठी तर घातक आहे. स्टील, मेटलच्या बाटलीचा वापर करा आणि प्लास्टिक बाटली वापरू नका अशी जनजागृती बांबूपासून बनवलेली बाटली कलाकृती करत होती. मातृत्वाचे महत्त्व विशद करणारी भूमाता प्रती ऋण व्यक्त करणारी कलाकृती सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. तसेच पोस्ट विभागाचा इतिहास उलगडून दाखवणारी कलाकृती येथे विशेष आकर्षण ठरत होती. विविध कलाकुसरीच्या वस्तूंचे स्टॉल ग्राहकांचे लक्ष वेधत होते. ग्रामीण भागातील महिलांनी तयार केलेली रेशीम पासून बनवलेली ज्वेलरी , मुंबई महानगरपालिका बचत गटाचा स्टॉल , राजस्थानी, गुजराती, कर्नाटक, बंगाल आदी राज्यातील कलाकुसरीच्या स्टॉल्सचा समावेश महोत्सवात होता.