यक्षाची विरहावस्था वर्णन करताना कालिदास एकापेक्षा एक विरहव्याकुळतेचे दाखले देतो. त्यामुळेच यक्षाचे व त्याच्या पत्नीचे एकमेकांवर असणारे उत्कट प्रेम पाहून वाचकाच्या मनात त्या दोघांबद्दल सहानुभूती निर्माण झाल्याशिवाय रहात नाही.
धारासिक्तस्थलसुरभिणस्त्वन्मुखस्यास्य बाले
दूरीभूतं प्रतनुमपि मां पञ्चबाणः क्षिणोति।
धर्मान्तेएस्मिन्वगिणय कथं वासराणि व्रजेयु-
र्दिकसंसक्तप्रविततघनव्यस्तसूर्यातपानि।।
अर्थः- हे बाले! पावसाने शिंपडलेल्या जमिनीप्रमाणे सुवासिक असलेल्या ह्या तुझ्या मुखाच्या दूर असलेल्या, कृश झालेला असताही हा मदन मला ताप देत आहे. तेव्हा चौफेर दूर पसरलेल्या मेघांनी सूर्यप्रकाश नाहिसा केलेले ह्या उन्हाळय़ाचे शेवटचे दिवस कसे जात असतील याची कल्पना कर.
वरील श्लोक हा प्रक्षिप्त श्लोक असून हाही आधीच्या श्लोकाऐवजी प्रतिकृतीदर्शनासाठी घेतला होता. पण ह्याआधीचा अत्युत्तम श्लोक विद्वानांच्या मते कालिदासाचा असल्याने तोच मेघदूतात समाविष्ट केला आहे.
मामाकाशप्रणिहितभुजं निर्दयाश्लेषहेतो-
र्लब्धायास्ते कथमपि ह्या स्वप्नसंदर्शनेषु।
पश्यन्तीनां न खलु बहुशो न स्थलीदेवतानां
मुक्तास्थूलास्तरुकिसलयेश्वश्रुलेशाः पतन्ती।।
अर्थः- स्वप्नांत मी मोठय़ा कष्टाने मिळवलेल्या तुझे गाढ आलिंगन मिळावे ह्या हेतूने अंतराळात हात लांब पसरलेल्या मला पाहणाऱया वनदेवतांचे मोत्याएवढे अश्रूबिंदू झाडांच्या कोवळय़ा पालवीवर पडत नाहीत असे बहुधा होत नाही.
यातील अश्रू म्हणजे दवबिंदू होत. त्यांना वनदेवतांचे अश्रू असेही म्हटले आहे. देवतांच्या अश्रुंना तरुकिसलय म्हणजे झाडांची पालवी मिळाली….ह्या श्लोकात विरहाची तिसरी अवस्था म्हणजे ‘स्वप्नदर्शन’ त्याचे वर्णन आहे. त्यापुढील प्रकाराचे वर्णन कसे केले आहे ते पहा….
भित्त्वा सद्यः किसलयपुटान्देवदारुद्रुमाणां
ये तक्षीरस्रुतिसुरभयो दक्षिणेन प्रवृत्ताः।
आलिङ्ग्यन्ते गुणवति ह्या ते तुषाराद्रिवाताः
पूर्वी स्पृष्टं यदि किल भवेदङ्गमेभिस्तवेति।।
अर्थः- देवदार वृक्षांच्या कोवळय़ा कोंबांना एकदम भेदून त्यातील रसस्रावाने सुगंधित झालेले जे हिमालयावरील वारे दक्षिण दिशेकडे वहात येतात, त्यांनी तुझ्या शरीराला अगोदर खरोखर स्पर्श केला असेल, असे समजून, हे गुणवती स्त्रिये, मी त्यांना कवटाळतो.
वरील श्लोकात विरहाचा चौथा प्रकार ‘अंगस्पृष्टवस्तुदर्शन’ याचे वर्णन केले आहे.