राज्याचे सरकार स्थापन करण्याच्या हालचाली
प्रतिनिधी /पणजी
काळजीवाहू मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे दिल्लीकडे रवाना झाले आहेत. मंगळवारी सकाळी आमदारांचा शपथविधी सोहळा झाल्यानंतर संध्याकाळी डॉ. सावंत व तानावडे दिल्लीकडे रवाना झाले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
विधानसभा निवडणुकीत भाजपला 20 जागा मिळाल्या असून अपक्ष आमदारांनीही पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे सरकार स्थापन करण्याइतका आकडा भाजपकडे सद्यस्थितीत तरी नक्कीच आहे. असे असतानाही भाजपचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार अद्याप ठरत नसल्याने तर्कवितर्क निर्माण झाले आहेत. गोव्यात मुख्यमंत्री निवडण्यासाठी पक्षाने केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर व केंद्रीय मत्स्योद्योगमंत्री एल. मुरुगन यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. दोन्ही नेते मंगळवारी गोव्यात येणार असल्याची माहिती असतानाही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे दिल्लीकडे रवाना झाले असल्याने अनेक सवाल निर्माण झाले आहेत.
पंतप्रधानांसमवेत महत्त्वाची बैठक
गोव्यात सरकार स्थापन करण्याबाबत डॉ. सावंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार असून त्यांच्यासोबत महत्त्वाची बैठक होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री केंद्रीयमंत्री अमित शहा तसेच भाजपाचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचीही भेट घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे हेही दिल्लीला रवाना झाले आहेत. 2022च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 20 जागांवर आघाडी मिळविल्यानंतर सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. निवडणुकीचा निकाल लागण्याच्या एक दिवस अगोदर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संपर्क केला असता राज्यात भाजपचे सरकार स्थापन करणे गरजेचे आहे, असे मोदी यांनी सांगितले होते. त्यानुसार आपण मोदी तसेच इतर नेत्यांना भेटण्यासाठी दिल्लीत जात असल्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांना सांगितले आहे.
2022 ची विधानसभा निवडणूक भाजपने स्वबळावर लढविली होती. चाळीसही जागांवर उमेदवार उभे केले होते. त्यात 20 जागा जिंकून भाजप सर्वात मोठा पक्ष बनला आहे. अपक्ष आमदारांच्या सहकार्याने भाजप लवकरच राज्यात सरकार स्थापन करेल यात शंकाच नाही मात्र खाती वाटपावरून रुसवे-फुगवे निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.