दूधगंगा काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा
प्रतिनिधी / सरवडे
काळम्मावाडी ता. राधानगरी येथील राजर्षी शाहू प्रकल्पातून ३६०० कुसेक्स पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू केला आहे. परिणामी दुधगंगा नदी धोक्याच्या पातळीवर वाहत असून काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
आज धरण परिक्षेत्रात ५९ मिलिमीटर तर आज अखेर २१८० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे यामुळे आज जलाशयाची पातळी ६४२.५६ मीटर तर पाणीसाठा ६०५.८८८ द.ल.घ.मी म्हणजेच २१.३९ टी.एम.सी.(८४.२२ टक्के) इतका झालेला आहे.
धरणाच्या पाच वक्राकार दरवाजातून २६०० कुसेक्स तर जल विद्युत केंद्रातून १००० कुसेक्स असा एकूण ३६०० कुसेक्स पाण्याचा विसर्ग दूधगंगा नदी पात्रात केला जात आहे. ६४६.००मीटर म्हणजेच २५.४० टी.एम.सी.ला धरण पूर्ण क्षमतेने भरणार असल्याचे उप अभियंता भाग्यश्री पाटील यांनी सांगितले. यावेळी शाखा अधिकारी हरिभाऊ कुंभार, अंजली कारेकर ,महादेव सावंत आदी उपस्थित होते.