जलविद्युतकेंद्र व सांडव्यावरून ४२०० क्युसेक पाण्याचा विसर्ग
प्रतिनिधी/ सरवडे
जिल्ह्यातील बहुतांशी भागाला शेती आणि पिण्याचे पाणी पुरवणारे राधानगरी तालुक्यातील काळम्मावाडी (दूधगंगानगर) येथील राजर्षी शाहू धरण परिसरात गेले चार दिवस पावसाने जोर धरला असल्याने धरण ८४.१२ टक्के भरले आहे. धरणाच्या सांडव्यावरून २३०० क्युसेक तर जलविद्युत केंद्रातून १९०० क्युसेक असे एकुण ४२०० क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू आहे. आज धरणात ८४.१२ टक्के म्हणजेच (२१.३६ ) टी. एम. सी. इतका पाणी साठा झाला आहे. पावसाचा जोर लक्षात घेऊन पाण्याचा विसर्ग सुरु केला असून नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
आज काळम्मावाडी धरण परिक्षेत्रात ४० मिलिमीटर इतका पाऊस झाला असून आज अखेर धरण क्षेत्रात २३९१ मिलिमीटर इतका पाऊस झाला आहे .यामुळे आजची धरणाची पाणी पातळी ६४२.५३ मिटर तर पाणीसाठा ६०४.९३४ द.ल.घ मी. मी म्हणजेच ८४.१२ टक्के (२१.३६ टी.एम.सी.) इतका झाला आहे .
जिल्ह्यातील अधिक पाणीसाठा असणारे हे धरण असून जिल्ह्यातील बहुतांशी भाग व कर्नाटकला या धरणातून पाणी पुरवठा केला जातो. हे धरण ८४टक्के भरल्याने समाधान व्यक्त होत आहे.