धरण ६९ टक्के भरले : दूधगंगा नदी पात्राबाहेर
प्रतिनिधी / सरवडे
राधानगरी तालुक्यात चार दिवस मुसळधार कोसळणार्या पावसाने अक्षरशः थैमान घातले. काळम्मावाडी धरण परिक्षेत्रात काल तुफानी पाऊस झाला. सकाळी सहा पर्यंतच्या २४ तासात ४८० मि.मि. विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. धरणात ६९ टक्के म्हणजेच १७.५५ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरण भरण्यासाठी अवधी असल्याने केवळ १०० क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे.
राधानगरी तालुक्याला चार झोडपून काढले आहे. त्यामुळे तालुक्यातील राधानगरी, तुळशी धरणांच्या व भोगावती, दूधगंगा, तुळशी, धामणी नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली. काल दिवस-रात्र ढगफुटी सारखा पाऊस कोसळला. त्यामुळे सगळीकडे पाण्याचा प्रलय दिसू लागला. काळम्मावाडी धरण परिक्षेत्रात काल तब्बल ४८० मि. मि. तर आज अखेर १८४७ मि. मि. पाऊस झाला आहे. धरणाची पाणी साठा क्षमता २६ टि. एम.सी. इतकी असून आज अखेर १७.५५ टीएमसी इतका पाणी साठा झाला आहे.
धरणातून नदी पात्रात केला जाणारा विसर्ग कमी असला तरी पावसाचे प्रमाण अधिक असल्याने दूधगंगा नदी पात्राबाहेर पडली आहे. अनेक बंधारे पाण्याखाली गेल्याने वहातुक बंद आहे.अनेक घरात, दुकानात पाणी शिरल्याने लोकांचे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे अशा पावसात जर काळम्मावाडीतून विसर्ग सुरु केला असता तर नदीकाठच्या लोकांना मोठ्या संकटाशी सामना करावा लागला असता परंतु मोठा विसर्ग न केल्यामुळे लोकांची होणारी हानी टळली आहे.