कोकरूड वार्ताहर
शिराळा तालुक्यातील काळामवाडी येथील ज्ञानदेव चिंचवाडकर , शामराव चिंचवाडकर व आबासो चिंचवाडकर यांच्या राहत्या घराला अचानक आग लागून सर्व संसारोपयोगी साहित्य जाळून खाक झाले असून या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही मात्र 12 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी,काळामवाडी येथे ज्ञानदेव रामचंद्र चिंचवाडकर, शामराव रामचंद्र चिंचवाडकर व आबासो ज्ञानदेव चिंचवाडकर यांचे ११ खणी चौघईचे घर आहे.दुपारी तीनच्या दरम्यान आबासो यांच्या गिरण व गॅरेज असणाऱ्या ठिकाणी अचानक आग लागली.सलग एकच घर असल्याने व दुपारी वाऱ्याचा वेग मोठा असल्याने आग सर्वत्र पसरली. ग्रामस्थांनी प्रसंगावस्थान राखून जनावरांना बाहेर काढले.त्यामुळे कोणतीही जीवित हानी झाली नाही. चिंचवाडकर कुटुंबियांची कपडे, व इतर साहित्य माडीवर असल्याने ते काढता आले नाही. त्यामुळे त्यांचे सर्व संसारोपयोगी साहित्य जाळून खाक झाले.
लागलेली भिषण आग विझवण्यासाठी गावातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली.गावातील नळपाणी पुरवठा योजना सुरु करून व दोन टँकरच्या सहाय्याने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.परंतु आग आटोक्यात आली नाही. त्यामळे किनरेवाडी येथून पाण्याचा टँकर आणला तरी ही पाणी अपुरे पडू लागल्याने निनाई दालमिया कारखान्याने त्यांच्याकडील पाण्याचा टँकर पाठवला. त्यावेळी आग आटोक्यात आली. पण तो पर्यंत सर्व साहित्य जाळून खाक झाले.
घटनास्थळी भूषण नाईक, माजी सभापती हणमंतराव पाटील यांनी भेट दिली. ही आग आटोक्यात आणण्यासाठी बालगणेश मित्र मंडळ,गणेश मित्र मंडळ व गावतील ग्रामस्थांनी प्रयत्न केले. पंचनामा करण्यात आला असून अंदाजे 12 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे.