जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून दिले निवेदन
प्रतिनिधी/ बेळगाव
उत्तर प्रदेशमधील हाथरस येथील एका मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा निर्घृण खून करण्यात आला. या घटनेमुळे संपूर्ण देशातूनच संतापाची लाट उसळली आहे. बेळगाव जिह्यातूनही या घटनेचा तीव्र निषेध नोंदविण्यात येत आहे. विविध दलित संघटनांबरोबरच महिला संघटना त्या विरोधात मोर्चा काढुन निवेदन देत आहेत. सोमवारी सहा संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढुन निवेदन दिले.
देशातील महिला सुरक्षित नाहीत. कारण वारंवार अत्याचाराच्या घटना घडून युवतींचा व महिलांचा खून करण्यात येत आहे. यामुळे महिलांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. केंद्र सरकार आणि उत्तर प्रदेश सरकारला महिलांबाबत आदर नाही. या उत्तर प्रदेशमध्ये घडलेल्या घटनेनंतर तेथील पोलिसांनी आणि प्रशासनाने त्या पिडीत महिलेच्या कुटुंबीयांवर दबावतंत्राचा वापर केला आहे. हे लोकशाहीविरोधी आहे. आम्ही स्वतंत्र भारतात राहत असताना अशाप्रकारे कुटुंबावर दबाव घालणे हे योग्य नाही म्हणत केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारचा तीव्र निषेध नोंदविण्यात आला.
काही नराधमांनी त्या युवतीवर लैंगिक अत्याचार करून तिचा अमानुष्य खून केला. या घटनेनंतर उपचारासाठी पोलिसांनी कोणत्याच हालचाली केल्या नाहीत. तिच्या मृत्यूनंतर मृतदेह देखील नातेवाईकांच्या ताब्यात दिला नाही. रात्रीच्यावेळी तिच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेवरुन आता तीव्र आक्षेप विविध संघटना नोंदवत आहेत. गेल्या चार दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चे काढुन निवेदने विविध संघटना देत आहेत.
वाल्मिकी मेहतर समाजाचे निवेदन
उत्तर प्रदेश येथे वाल्मिकी समाजाच्या युवतीवर लैंगिक अत्याचार झाले आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेश सरकार हे दलित व मागासवर्गीय जातींच्या विरोधात असल्याचा आरोप वाल्मिकी मेहतर समाजाने केला आहे. केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारने या युवतीच्या बाबतीत तसेच तिच्या कुटुंबीयांवर जे दबावतंत्र वापरले आहे ते खरोखरच लाजीरवाणे आहे. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी वाल्मिकी मेहतर समाजाने केली आहे.
दिल्ली येथे मनीषाच्या नावाने स्मारक उभे करावे. या घटनेतील आरोपींना भर चौकात फाशी द्यावी, अशा घटना घडू नये यासाठी केंद्र सरकारबरोबरच देशातील इतर राज्यांच्या सरकारांनी महिलांच्या रक्षणासाठी कडक कायद्याबरोबरच त्यांना संरक्षण द्यावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली. यावेळी दीपक वाघेला, शेखर चाबरी, अशोक चव्हाण, मुरली चव्हाण, सुभाष चव्हाण, अशोक बिदलानी, सुनील बनसे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
जिल्हा वाल्मिकी नायक समाज
हाथरस येथे घडलेल्या घटनेमुळे आम्ही मागासवर्गीय जनता घाबरलो आहे. कारण आजपर्यंत दलित आणि मागासवर्गीय यांच्यावरच अन्याय झाले आहेत. देश स्वातंत्र्य मिळून 70 हून अधिक वर्षे उलटली आहेत. तरीदेखील दलित व मागासवर्गीय तरुणींवर तसेच महिलांवरील अन्याय सुरूच आहेत. केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकार अपयशी झाले आहेत. त्यामुळेच असे प्रकार घडत असल्याचा आरोप वाल्मिकी नायक समाजाने केला आहे. यावेळी राजशेखर तळवार, अजित नाईक, राजेंद्र पंगण्णावर यांच्यासह समाजातील नागरिक उपस्थित होते.
वंचित बहुजन महिला आघाडी
देशात स्त्राrयांवर अन्याय आणि अत्याचार करण्याचे प्रकार सुरूच आहेत. त्यामुळे महिलांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. अशा घटना घडत राहिल्या तर आम्ही घरातून बाहेर पडायचे की नाही? असा प्रश्न महिलांनी केला आहे.
वंचित बहुजन महिला आघाडीच्या महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली. हाथरस येथील त्या घटनेतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा करावी. पोलिसांकडून सुरू असलेली दडपशाही थांबवावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी ऍड. विद्या लकोळी, दिपीका मंजलकर, ज्योती कडलासकर, महेश कांबळे, प्रियांका लक्कोळी यांच्यासह महिला उपस्थित होत्या.
चलवादी महासभेचे निवेदन
उत्तर प्रदेशमध्ये घडलेली ही घटना संपूर्ण देशाला काळिमा फासणारी आहे. या घटनेतील आरोपींना भररस्त्यात फाशी द्यावी. एका युवतीवर लैंगिक अत्याचार करून तिचा खून केला. त्यानंतर ती कोणालाही याची माहिती देऊ नये म्हणून त्या युवतीची जीभ कापली. या घटनेमुळे महिलावर्ग हादरला आहे. आता उत्तर प्रदेश सरकारने या आरोपींना तातडीने फाशी देऊन त्या कुटुंबाला आणि सर्व दलितांना न्याय द्यावा, अशी मागणी चलवादी महासभेच्यावतीने करण्यात आली आहे.
वाल्मिकी समाजातील मुलीचे अपहरण करून तिच्यावर अमानुष्य अत्याचार करण्यात आले आहे. सफदरजंग इस्पितळात त्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. सरकारने नराधमांना फाशी द्यावी. जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढून निवेदन दिले. यावेळी दुर्गेश मेत्री, दीपक मेत्री, कृष्णा कोलकार, धनपाल अक्षीमनी, कृष्णा कांबळे, परशराम कांबळे यांच्यासह चलवादी महासभेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
दलित सेना
दलित सेनेनेही जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढुन त्या नराधमांना फाशी द्या. याचबरोबर मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी यांचा राजीनामा घेऊन भाजपने महिलांना न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली. जी घटना घडली आहे ती गंभीर आहे. त्या ठिकाणी पत्रकारांनाही सोडण्यात आले नाही. त्यामुळे उत्तरप्रदेशमधील सरकार त्यांच्या कुटुंबांची यातना लपविण्याचा प्रयत्न करत असून या घटनेचा सीबीआयमार्फतच तपास करावा, अशी मागणी करण्यात आली. यावेळी सुरेश हरिजन, लक्ष्मण हरिजन, गदग्याप्पा यडाल, यल्लाप्पा मुलीनमनी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
भारतीय बौद्ध महासभा
भारतीय बौद्ध महासभेच्यावतीने उत्तर प्रदेशमधील त्या घटनेचा निषेध नोंदविण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढुन त्यांनी निवेदन देऊन निषेध नोंदविला आहे. एका युवतीवर अत्याचार झाले आणि उत्तरप्रदेश सरकार ते दडपण्याचा प्रयत्न करत आहेत. हे खरोखरच लाजीरवाणी गोष्ट आहे. भाजप सरकारने तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली. यावेळी शर्वन शेंडे, शिवाप्पा हळ्ळी, यमनाप्पा गडीनाईक, संजीवकुमार शेंडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते..