शहर म. ए. समितीच्या बैठकीत निर्णय
बेळगाव /प्रतिनिधी
मराठी भाग अन्यायाने गेली 65 वर्षे कर्नाटकात आहे. महाराष्ट्रात जाण्यासाठी येथील जनता लढे देत आली आहे. 1 नोव्हेंबर रोजी सीमाभागात आजपर्यंत मूक सायकलफेरी काढून कर्नाटक सरकारचा निषेध नोंदविण्यात आला आहे. यावषी कोरोनामुळे मूक सायकलफेरीला परवानगी देण्यात आली नाही. त्यामुळे घरांवर काळे ध्वज लावून, तोंडाला काळे मास्क घालून, दंडाला काळी फीत बांधून निषेध नोंदविण्याचा निर्णय शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
जत्तीमठ येथे झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी शहर म. ए. समितीचे सरचिटणीस किरण गावडे होते. सीमाभागातील मराठी जनता गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रात जाण्यासाठी आंदोलन करत आहे. याबरोबरच महाराष्ट्र सरकारकडे पाठपुरावा करत आली आहे. 1 नोव्हेंबर 1956 रोजी हा मराठी मुलुख कर्नाटकात डांबण्यात आला. भाषावार प्रांतरचना करताना या भागातील मराठी भाषिकांवर अन्याय करण्यात आला आहे. त्यामुळे आजपर्यंत केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांचा निषेध नोंदविण्यात येत आहे, असे सरचिटणीस किरण गावडे यांनी स्पष्ट केले.
महिला आघाडीच्या अध्यक्षा रेणू किल्लेकर म्हणाल्या, यावर्षी कोरोनामुळे आम्हाला काळय़ादिनी काढण्यात येणाऱया सायकलफेरीला परवानगी मिळणार नाही, त्यामुळे आता सीमाभागातील प्रत्येक मराठी भाषिकांनी आपल्या घरांवर काळे ध्वज लावावेत, याबरोबरच याच दिवशी काळय़ा रंगाचा मास्क वापरावा आणि आपला निषेध नोंदवावा, असे आवाहन केले.
बाळासाहेबर काकतकर यांनीही काळादिन साऱयांनी गांभीर्याने पाळावा, असे आवाहन केले. त्याबरोबरच त्या दिवशी सीमाभागामध्ये कडकडीत हरताळ पाळून निषेध नोंदवावा, असेही सांगितले. एकजुटीने या लढय़ाला बळकटी देणे गरजेचे असल्याने त्यांनी सांगितले.
यावेळी माजी महापौर सरिता पाटील, मराठी युवा मंचचे अध्यक्ष नारायण किटवाडकर, शिवाजी हंडे यांनी आपले विचार व्यक्त केले. प्रारंभी माजी आमदार बी. आय. पाटील, शहर म. ए. समितीचे चिटणीस द्वारकानाथ उरणकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या बैठकीला सुहास किल्लेकर, अजित कोकणे, सुधीर कालकुंद्रीकर, राजू पाटील, मेघन लंगरकांडे, रूपा नावगेकर, आकाश शिरोळकर, प्रतिक लोहार, वैभव कामत, सौरभ जांभळे यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.