जोयडा : शिवपूर (ता. जोयडा) जवळून वाहणाऱया काळय़ा नदीवर झुलता पूल बांधून पाच वर्षे झाली. मात्र पुलाला वापरण्यात आलेले लोखंडी दोरखंड व नटबोल्ट गंजत आहेत. उळवी ग्रा. पं. व जिल्हा प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने उळवी, नेत्रुर्गा, शिवपूर, गुंद, यरमूक, नंदिगद्दा, शेवाळी, अवर्ली भागातील नागरिकांनी याबाबत जिल्हा प्रशासनाकडे निवेदन देऊन या पुलाची डागडुजी व रंगरंगोटी करावी, अशी मागणी केली आहे. शिवपूरजवळून वाहणाऱया काळय़ा नदीवर झुलता पूल 2015 मध्ये 3 कोटी रुपये खर्च करून बांधला आहे. पुलाची लांबी 322 मीटर व 1.5 मीटर रुंदी आहे. हा पूल बांधल्यामुळे वरील गावांना यल्लापूर गाव जवळ झाले आहे. तसेच या पुलावरून दुचाकी ये-जा करण्याची सोय केली आहे. पुलाची डागडुजी दर तीन वर्षांनी करणे आवश्यक आहे. पण पाच वर्षे झाली तरी दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाल्याने पुलाला वापरलेल्या तारा व नटबोल्ट गंजत आहेत. असेच दुर्लक्ष झाल्यास हा पूल पुढील पाच वर्षांत टिकेल की नाही याची शास्वती नाही. उळवी यात्रवेळी यल्लापूर, शिर्सी, मुंदगोड व कलघटगी या तालुक्यातील हजारो वाहने या पुलावरून ये-जा करतात. उळवी ग्रा. पं. दुचाकी चालकांकडून प्रवेश फी वसूल करते. आतापर्यंत लाखो रुपये जमा झाले आहेत. पण पुलाच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाले आहे. याबाबत कारवार जि. पं. चे सीईओ महमद रोशन यांना विचारले असता, संबंधित विभागाच्या अधिकाऱयांना पुलाचे परीक्षण करून दुरुस्ती करण्याचे आदेश देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
Previous Articleमेक्सिकोत 11,251 नवे कोरोना रुग्ण
Next Article प्लास्टिकचा वापर आढळल्यास कठोर कारवाई
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.