नाक्यावरील टोळक्याची दहशत संपवण्याची गरज
सुधाकर काशीद / कोल्हापूर
कावळा नाका म्हणजे ताराराणी चौक. करवीर संस्थानच्या संस्थापिका ताराराणी यांच्या नावाचा हा चौक. पण सध्या हा चौक एका टोळक्याच्या ताब्यात आहे. या चौकावर जणू त्यांचेच राज्य आहे. या चौकातल्या मामा किंवा आण्णाचा कावळा नाक्यावर ये असा निरोप आला की आपण ओळखायचे काहीतरी लफडा आहे…..
या चौकातले हे टोळके येथे मांडवली करते. घर मालक कुळातला वाद दादागिरीने संपवते. सावकारीतल्या पैशाची वसुली करून देते. एखाद्या बिल्डरला जागा मोकळी करून देते. अपघाताच्या प्रकरणात तडजोड करून देते. केवळ आणि केवळ दहशतीच्या जोरावर हे सारे केले जाते. पोलिसात तक्रार होणार नाही याची सारी खबरदारी घेतली जाते. हे सारे कावळा नाक्याच्या चौकात एका बाजूला खुर्च्या टाकून बसलेल्या टोळक्याकडून समोर शाहूपूरी पोलीस ठाण्याची चौकी असली तरी सुरू असते. यांच्या नादाला कोण कशाला लागायचे म्हणून तक्रार करायलाही कोण धजावत नसते. आणि याच हवेवर या टोळक्यानेचे काम साधले जाते. आजवर हे जरुर साधले गेले आहे. पण आता पहिल्यांदाच पोलिसांनी झटकेबाज कारवाई केली आहे. अर्थात सापडलेले दुसऱया-तिसऱया फळीतले आहेत अशी चर्चा आहे. मूळ मात्र अजून कारवाईपासून लांब असल्याचा संशय आहे. यामुळे मूळ गड्डÎाला जेव्हा हात लागेल तेव्हा कावळा नका मुक्त श्वास घेणार घेऊ शकणार आहे.
आत्ताचा ताराराणी चौक म्हणजे मूळचा कावळा नाका. फादर कॉव्हेल यांच्या नावावरून त्याचा उच्चार कावला असा केला जाऊ लागला. आणि कावळा नाका असा त्याचा अपभ्रंश झाला. हा नाका म्हणजे कोल्हापूरचे शेवटचे टोक. पूर्वी पुणे-बंगळुरू रोड या नाक्याला वळसा घालून पुढे जायचा. म्हणून हा नाका कायम गजबजलेला असायचा. या नाक्यावर गरीब कष्टकरी लोकांची वस्ती. राबाडे यांचा एक पेट्रोल पंप. मेरी वॉनलेस म्हणजे डनिंग बाईचा दवाखाना व सरकारी रेस्टहाऊस एवढीच काय ती जाणवणारी वर्दळ होती.
गेल्या काही वर्षात नाका शहराचा केंद्रबिंदू झाला. आणि फुटकळ दादागिरी करणाऱया काहीजणांनी तेथे तळ ठोकला. या नाक्यावरच त्यांचा अड्डा भरु लागला आणि आपल्या भीतीने लोक आपल्या नादाला लागत नाही त्याचा अंदाज आल्यावर त्यांनी या नाक्यावर मांडवलीचा धंदा मांडला. त्यांचे वाढदिवस म्हणजे ताराराणीच्या पुतळ्याचा हा चौक गुंडांच्या वाढदिवसाच्या पोस्टरनी अक्षरश: झाकून जाऊ लागला. यांच्या ताकदीचा अंदाज आल्यावर काही राजकीय नेत्यांनीही अडचणीच्या काळात या टोळक्याचा आधार घेतला. अर्थात त्यामुळे या टोळक्याचा रुबाब आणखीनच वाढला.
गेल्या काही वर्षात तर या टोळक्याने आपला चांगलाच जम बसवला आहे. शिरोली नाका, रेल्वे फाटक, वृषाली हॉटेल चौक, एसटी स्टॅन्ड, शिवाजी पार्क परिसरावर आपला दबदबा निर्माण केला आहे. एकच नव्हे एका टोळीतून आणखी वेगवेगळ्या टोळ्या तयार झाल्या आहेत. गाडÎांच्या नंबर प्लेटवर नंबर न लिहिता आपापल्या नेत्यांचे नाव लिहून त्यांच्या गाडÎा फिरवल्या जात आहेत. ड्राय डे म्हणजे दारूविक्री बंद पण या दिवशी अगदी उघडपणे दारू मिळण्याचे ठिकाण म्हणून कावळा नाका आता ओळखला जाऊ लागला आहे.
ह्या नाक्यावरच्या टोळक्याची खूप मोठी दहशत आहे. तक्रार करायला कोण पुढे येत नाही हे वास्तव आहे. तरीही उशिरा का होईना पोलिसांनी कारवाईचे पहिले पाऊल उचलले आहे. यातून कावळा नाका म्हणजे या टोळक्याचे राज्य ही ओळख पुसून जाण्याची गरज आहे. कारण कावळा नाका म्हणजे करवीर संस्थापिका ताराराणी यांच्या अस्तित्वाचा चौक आहे आणि त्याला काही गुंडांनी घेरून टाकणे म्हणजे कोल्हापूरचा अवमान आहे.