आयआयटीमधील पीएचडीसाठी ठरला पात्र : पिलानी-राजस्थानला होणार रवाना
वार्ताहर / किणये
कावळेवाडी गावचे सुपुत्र विक्रम नाईक हे नुकत्याच झालेल्या ‘गेट’ परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाले आहेत. प्रचंड इच्छाशक्ती व जिद्दीच्या जोरावर त्यांनी हे यश मिळविले असून आयआयटीमध्ये पीएचडीसाठी ते पात्र ठरले आहेत. यामुळे बेळगाव परिसरात त्यांचे कौतुक होत आहे.
डिसेंबर महिन्यात विक्रम यांनी ‘गेट’ची परीक्षा दिली होती. शुक्रवारी या परीक्षेचा निकाल आला असून यामध्ये त्यांनी यश मिळविले आहे. जागतिक पातळीवरील बिर्ला इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी, पिलानी-राजस्थान यांच्याकडून त्यांना प्रतिमहिना पीएचडीसाठी 35 हजार रुपयांची फेलोशिप मिळणार आहे. यामुळे पीएचडी करण्यासाठी ते राजस्थानला रवाना होणार आहेत.
विक्रम नाईक हे शालेय जीवनापासूनच हुशार विद्यार्थी म्हणून ओळखले जातात. कावळेवाडी येथील निवृत्त प्राध्यापक व कवी वाय. पी. नाईक व भारती नाईक यांचे ते चिरंजीव आहेत. त्यांचे शालेय शिक्षण मिलाग्रीस येथे झाले. पदवीचे शिक्षण कुडाळ या ठिकाणी झाले. मुंबई विद्यापीठातून त्यांनी एमएस्सी पदवी मिळविली. त्यानंतर ‘नेट’, ‘सेट’, ‘जेआरएफ’ या परीक्षा उत्तीर्ण झाले.
गेल्या पाच महिन्यांपासून ते बेळगाव येथील जीआयटी कॉलेजमध्ये गणित विषयाचे लेक्चरर म्हणून सेवा बजावत होते. ‘गेट’ परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाल्यामुळे गणित विषयात ते पीएचडी करणार आहेत. ग्रामीण भागातील एका तरुणाने केवळ जिद्दीच्या जोरावर शिक्षण क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली असल्यामुळे त्यांनी आपल्या गावचे नाव उंचावले आहे.
ग्रामीण भागातील इतरही तरुणांनी सातत्याने अभ्यास करून उच्चशिक्षण घेऊन प्रशासनाकडून मिळणाऱया योजना व विविध संस्थांकडून मिळणाऱया आर्थिक साहाय्याचा लाभ करून घ्यावा, असे त्यांनी सांगितले.