तालुक्यातील 1152 भक्तांनी केली यात्रा : गंगा पूजन, कीर्तन, महाप्रसादाचे आयेजन
वार्ताहर /किणये
तालुक्मयातील 1152 भक्तांनी काशी, गया, त्रिवेणी संगम यात्रा केली. नऊ दिवस यात्रा करून सोमवारी रामलिंग मंदिर, नावगे येथे यात्रेचा सांगता कार्यक्रम झाला.
गेल्या सहा महिन्यांपासून काशी-त्रिवेणी संगम यात्रा करण्यासाठी तालुक्मयातील भाविक प्रतीक्षेत होते. मात्र, कोरोनामुळे यात्रा लांबणीवर पडली होती. अखेर प्रशासनाच्या नियमावलीनुसार दि. 21 डिसेंबर रोजी बेळगाव रेल्वेस्थानकातून हे भाविक यात्रेला रवाना झाले. यात्रेसाठी एक खास रेल्वे बुकींग केली होती. प्रवासात 9 दिवस भजन, प्रवचन हे नित्यपणे होत होते. या यात्रेकरूंनी उत्तरप्रदेश, बिहारमधील पवित्र तीर्थक्षेत्रांचे दर्शन घेतले. कडाक्याच्या थंडीतही त्यांनी यात्रा केली.
उत्तरप्रदेशमधील रामजन्मभूमी अयोध्या येथे एक दिवस दर्शन घेतले. त्यानंतर वाराणसी येथील काशी विश्वनाथांचे दर्शन घेतले. बिहारमधील गया येथील मंदिरात जाऊन दर्शन घेऊन त्रिवेणी संगम येथे पवित्र स्नान केले. नऊ दिवस प्रवास करून यात्रेकरू सुखरुपपणे परतले. त्यानंतर नावगे येथील रामलिंग मंदिरात यात्रेचा समारोप केला. सकाळी मंदिरात अभिषेक करून गंगा पूजन करण्यात आले. दुपारी ज्ञानेश्वरीतील नवव्या व बाराव्या अध्यायांचे वाचन केले. याचे अधि÷ान हभप सुरेश सुतार यांच्याकडे हेते.
सायंकाळी सोनोली येथील हभप परशराम कणगुटकर महाराज यांचे प्रवचन झाले. नावगे येथील हभप बसवाणी सुतार महाराज यांनी यात्रेचे महत्त्व पटवून दिले. रात्री 8 वाजता कोल्हापूर येथील हभप तुकाराम पोवार (धारवाडकर गुरुजी) यांचे कीर्तन झाले. यावेळी भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले होते.