लक्षावधींची उपस्थित, भव्य प्रकल्प, पर्यटनाला प्रोत्साहन मिळणार
वाराणसी / वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने साकारलेल्या भव्य ‘काशी विश्वनाथ धाम’ प्रकल्पाच्या प्रथम भागाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले आहे. हा अभूतपूर्व सोहळा पाहण्यासाठी असंख्य नागरिकांची उपस्थिती होती. या मार्गिका प्रकल्पामुळे जगप्रसिद्ध आणि ऐतिहासिक काशी विश्वनाथ मंदिर परिसराचा कायापालट झाला आहे, अशी प्रतिक्रिया उपस्थितांनी व्यक्त केली. ‘जेव्हा जेव्हा औरंगजेब निर्माण झाला, तेव्हा त्याला रोखणारे छत्रपती शिवाजी महाराजही निर्माण झाले आहेत, असे वीरश्रीयुक्त उद्गार पंतप्रधान मोदी यांनी या प्रसंगी काढले.
या मार्गिका (कॉरिडॉर) प्रकल्पामुळे काशी विश्वनाथाचे मंदिर पवित्र गंगा नदीशी जोडले गेले आहे. पाच लाख चौरस फुटांपेक्षाही अधिक क्षेत्रफळ असणाऱया या प्रकल्पाची निर्मिती निर्धारित वेळेपेक्षाही आधी झाली आहे. या प्रकल्पामुळे वाराणसी परिसर आणि आसपासच्या भागात पर्यटनाला मोठेच प्रोत्साहन मिळाणार आहे.
पूजन करुन उद्घाटन
सोमवारी दुपारी साधारणतः दीड वाजता पंतप्रधान मोदी यांनी काशी विश्वनाथाचे पूजन करून या मार्गिका प्रकल्पाचे उद्घाटन केले. त्याआधी त्यांनी येथील कालभैरव मंदिरात आराधना केली. नंतर गंगास्नान केले. तेथे त्यांनी गंगाजलाचे संकलन करुन त्या जलाचा अभिषेक काशी विश्वनाथाला केला.
नगर प्रदक्षिणा
उद्घाटनानंतर त्यांनी वाराणसी शहराची नगरप्रदक्षिणा केली. अनेक मार्गांवरुन ते चालले. अनेक स्थानी थांबून त्यांनी नागरिकांकडून फेटे, हार, फुले इत्यादींचा स्वीकार केला. याप्रसंगी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा, तसेच उत्तर प्रदेश आणि देशभरातून मोठय़ा संख्येने आलेले साधुसंत आणि नागरिक उपस्थित होते.
मंदिर परिसराचा विस्तार
या प्रकल्पाच्या आधी काशी विश्वनाथाचा मंदिर परिसर केवळ 3 हजार चौरस फुटाचा होता. मात्र, या प्रकल्पामुळे तो आता 5 लाख चौरस फुटापेक्षाही अधिक क्षेत्रफळाचा झाला आहे. या परिसरात आता 23 नवीन वास्तू निर्माण करण्यात आल्या आहेत. त्यामुळे काशी विश्वनाथाच्या दर्शनाला जगभरातून येणाऱया भाविकांसाठी विविध सोयी आणि सुविधा उपलब्ध होणार आहेत.
सायंकाळी गंगेची आरती
उद्घाटन आणि इतर कार्यक्रम आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सायंकाळी साडेसातच्या आसपास पवित्र गंगा नदीच्या ललित घाटावर गंगा नदीची आरती केली. हा कार्यक्रम वाराणसीमध्ये महत्वाचा मानला जातो. गंगा नदीचा हाच ललित घाट या प्रकल्पामुळे काशी विश्वनाथ मंदिराला जोडला गेला आहे. या प्रकल्पाचे आणखी भाग असून ते भविष्यकाळात पूर्ण पेले जाणार आहेत.
श्रमिकांचा सत्कार, त्यांच्यासह भोजन
हा प्रकल्प साकारणारे कर्मचारी, श्रमिक आणि अधिकाऱयांचा पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्यावर पुष्पवर्षाव करुन अभिनव पद्धतीने सत्कार केला. प्रत्येक कर्मचाऱयावर त्यांनी फुले उधळली. तसेच नंतर त्यांच्यासमवेत, त्यांच्यातच बसून भोजनाचा आस्वादही घेतला. त्यामुळे या कर्मचाऱयांनाही आनंदाचे भरते आले होते. ज्या श्रमिकांना आपला घाम गाळून हा प्रकल्प साकारला तेच या प्रकल्पपूर्तीचे श्रेयाचे खरे धनी आहेत, असे भावोत्कट उद्गार या प्रसंगी त्यांनी काढले.
कसा आहे हा प्रकल्प…
ड काशी विश्वनाथ मंदिराला गंगा नदीशी जोडणारा 75 मीटर रुंदीचा भव्य, सरळ मार्ग, मार्गाच्या दोन्ही बाजूला भक्तांसाठी विविध सुविधा
ड 23 नव्या भव्य वास्तू. या वास्तूंमध्ये भक्तांच्या निवासाची आणि अनुष्ठान तसेच आराधनेची सोय, इतरही अनेक आवश्यक सुविधा
ड 2019 मध्ये पंतप्रधान मोदींच्या हस्ते या प्रकल्पाची कोनशीला स्थापन करण्यात आली. अवघ्या दोन वर्षांमध्ये पहिला भाग पूर्ण
ड प्रकल्पाचे निर्माण होत असताना 40 जुनी मंदिरे सापडली. आता त्यांचे पुनरुज्जीवन करण्यात येत आहे. अनेक ऐतिहासिक वास्तू पुनर्स्थापित
ड वास्तूंची निर्मिती पारंपारिक शैलीत, पण सुविधा अत्याधुनिक. परंपरा आणि आधुनिकता यांचा संगम हे या प्रकल्पाचे सर्वात मोठे वैशिष्टय़
परिसर पूर्वीचा आणि आताचा
हा प्रकल्प साकारण्यापूर्वी काशी विश्वनाथाच्या मंदिराला जाण्यासाठी तसेच तेथून गंगा दर्शनासाठी जाण्यासाठी भक्तांना बऱयाच अडचणींना तोंड द्यावे लागत असे. अतिशय अरुंद मार्ग, अस्वच्छता, दुकानांची गर्दी अशा समस्यांमधून मार्ग काढत देवदर्शन करावे लागत असे. मात्र, आता हा परिसर भव्य, विस्तृत, स्वच्छ आणि विविध सोयी-सुविधांनी युक्त असा बनला असून शिवभक्तीचा आनंद शतगुणित होईल अशी व्यवस्था करण्यात आली आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
दोन लक्ष भक्तांची सोय
पूर्वी या परिसरात केवळ 500 ते 1000 भक्त एकत्र जमू शकत. आता एकाचवेळी 2 लक्ष भक्त एकाच वेळी एकत्र येऊ शकणार आहेत. 10 सहस्रांहून अधिक भाविक या परिसरात काही काळ वास्तव्य करु शकणार आहेत. परिसर हरित आणि अल्हाददायक राखण्यासाठी वृक्षराजी, फुलझाडे आणि इतर व्यवस्था करण्यात आली आहे. भक्तांना पूजन आणि अनुष्ठानासाठी आवश्यक साधने आणि वस्तू या परिसरातच विनासायास उपलब्ध होतील अशी व्यवस्था आहे.
गंगा नदीशी थेट संपर्क
या मार्गिका प्रकल्पातील एक मार्ग काशी विश्वनाथ मंदिराला गंगा नदीशी थेट जोडलेला आहे. त्यामुळे भक्तांना गंगा दर्शन आणि शिवदर्शन अतिशय सुलभ रितीने आणि कोणत्याही अडथळय़ाविना होणार आहे. शिवमंदिराची परिक्रमाही सुलभरितीने केली जाऊ शकेल अशी व्यवस्था करण्यात आली आहे.
आवेशपूर्ण भाषण
उद्घाटन सोहळय़ानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधारणतः 45 मिनिटे आवेशपूर्ण भाषणही केले. त्यात त्यांनी या प्रकल्पाचे महत्व आणि उद्देश स्पष्ट केले. गंगा नदीपासून मंदिरापर्यंत येण्यास या प्रकल्पामुळे भक्तांची सोय होणार आहे. विशेषतः वयस्कर आणि वृद्धांना याचा लाभ होईल. या भव्य मंदिरात आता 60,000 ते 70,000 भक्त एकाच वेळी पूजा आणि आराधना करु शकतील, अशी महिती त्यांनी दिली. काशी अविनाशी आहे. येथे महादेवाचे सरकार आहे. त्याच्या इच्छेविना येथे काहीच घडत नाही. या मंदिरावर परकीय आक्रमकांनी अनेकदा हल्ले केले. तथापि, हे मंदिर पुन्हा नव्या जोमाने उभे राहिले. परकीय आक्रकांना पराभूत करणारी ही भूमी आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.