ऑनलाईन टिम : नवी दिल्ली
भाजप नेते राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी शनिवारी सांगितले की, काश्मिरी पंडितांच्या सुरक्षेसाठी माजी सैनिकांचे एक विशेष दल तयार केले जावे जेणेकरुन त्यांना परत खोऱ्यात बिनदिक्कत राहता येईल.
येथील ‘नवरेह मिलन’ म्हणजे आंतर-सामुदायिक सांस्कृतिक महोत्सव कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना स्वामी म्हणाले की, “काश्मिरी पंडित 1990 च्या दशकात भयानक अनुभवातून गेले आहेत. म्हणून, जेव्हा परिस्थिती चांगली असेल तेव्हाच आम्ही त्यांना परत येण्यास सांगू. माझी सूचना अशी आहे की, एक लाख सैनिक, जे आता निवृत्त झाले आहेत, ज्यांना बंदुका कशा वापरायच्या आहेत हे माहित आहे, त्यांना त्यांच्या कुटुंबासह काश्मीरमध्ये पाच वर्षे राहण्यास सांगून त्यांना पगार देण्याची व्यवस्था करावी”