चोवीस तासात 9 दहशतवाद्यांना कंठस्नान
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
जगभरात कोरोनाविरोधात लढाई सुरू असताना पाकिस्तानच्या भारताविरोधातील कुरापती सुरूच राहिल्या आहेत. रविवारी उत्तर काश्मीरमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील केरन सेक्टरमध्ये झालेल्या चकमकीत तीन जवान हुतात्मा झाले. घुसखोरीचा प्रयत्न करणाऱया पाच दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आले. मागील चोवीस तासात 9 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे.
कुपवाडा जिल्हय़ातील केरन सेक्टरमध्ये दहशतवाद्यांनी घुसखोरीचा प्रयत्न करताना गोळीबार केला. याला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. चकमकीत सैन्यदलाच्या विशेष पथकांनी संयुक्त मोहीम राबवत दहशतवाद्यांचा डाव हाणून पाडला. चकमकीत पाच दहशतवादी ठार झाले. तर एक जवान हुतात्मा झाला. तर अन्य दोन गंभीर जखमी झाले होते. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती भारतीय सैन्यदलाच्या प्रवक्त्यांनी दिली. या चकमकीनंतर या परिसरात शोधमोहीम सुरू ठेवण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले. शनिवारी दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्हय़ात झालेल्या चकमकीत चार दहशतवादी ठार झाले होते. चौघांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला होता. सर्व दहशतवादी हिजबुल मुजाहिदीनचे होते. स्थानिक नागरिकांच्या हत्यांमध्ये त्याचा सहभाग असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले होते. दहशतवाद्यांकडून स्थानिक नागरिकांच्या हत्यांचे प्रमाण वाढले आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्यदलाने सर्वच परिसरात शोधमोहीम तीव्र केली आहे.