श्रीनगर / वृत्तसंस्था
जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्हय़ात सुरक्षा दलांनी चार दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. बुधवारी शालगुल वनभागात झालेल्या चकमकीत केंद्रीय राखीव पोलिस दलांच्या सैनिकांनी ही कामगिरी पार पाडली. या वनविभागात काही पाक प्रशिक्षित दहशतवादी लपलेले आहेत, विश्वसनीय माहिती सुरक्षा दलांना समजल्यानंतर त्यांनी या भागाला वेढा घातला. त्यांनी दहशतवाद्यांना शरण येण्यास सांगितले. तथापि, दहशतवाद्यांनी त्यांच्यावरच गोळीबार केल्याने प्रत्युत्तरादाखल सैनिकांना कारवाई करावी लागली, अशी माहिती देण्यात आली.
19 फेब्रुवारीला याच राज्यात दहशतवाद्यांनी 2 पोलिसांची हत्या केली होती. त्याच दिवशी झालेल्या दुसऱया चकमकीत 3 दहतवाद्यांना टिपण्यात आलेले होते. अशा प्रकारे गेल्या पाच दिवसांमध्ये सात दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. सीमेवर भारतीय सेना सज्ज असून दहशतवाद्यांचे सर्व मनसुबे हाणून पाडण्यात येतील, असे प्रतिपादन केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या प्रवक्त्याने केले.