नवी दिल्ली / वृत्तसंस्था
काश्मीरमध्ये मतदारसंघ पुनर्रचना जवळपास पूर्ण झाली असून येत्या सहा ते आठ महिन्यांमध्ये तेथे विधानसभा निवडणूक घेतली जाईल, अशी महत्वपूर्ण घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली आहे. एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना त्यांनी ही घोषणा केली. काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असून भारत आपला अधिकार सोडणार नाही, असेही त्यांनी ठासून सांगितले.
संपूर्ण काश्मीर भारताचे
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताशी सलोख्याचे संबंध प्रस्थापित करण्याची भाषा केली आहे. काश्मीरसह सर्व प्रश्न सामोपचाराने सोडविले पाहिजेत अशीही इच्छा त्यांनी व्यक्त केली. त्यावर विचारलेल्या प्रश्नावर अमित शहा यांनी संपूर्ण काश्मीर भारताचे असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. तसा प्रस्ताव संसदेने संमत केला आहे. तसेच आतापर्यंतच्या सर्व सरकारांनी हीच भूमिका ठामपणे घेतली आहे. मात्र, पाकचे काश्मीरसंबंधातील धोरण भारताच्या उलट आहे. परिणामी, या प्रश्नावर त्या देशाची चर्चा संभवत नाही, असे प्रतिपादन त्यांनी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे पाकिस्तान आणि चीन एकत्र आले, असा आरोप राहुल गांधी यांनी केला होता. तो धादांत खोटा असल्याचे शहा यांनी स्पष्ट केले. राहुल गांधी यांना काश्मींरचा इतिहास माहित नाही. पाकव्याप्त काश्मीर पाकिस्तानला मिळू दिल्याने चीन आणि पाकिस्तानची सीमारेषा जोडली गेली. 1962 मध्ये चीनशी युद्धात काय झाले आणि कोणामुळे झाले याची माहितीही राहुल गांधी यांना नाही, असाही टोला अमित शहा यांनी लगावला.