श्रीनगर / वृत्तसंस्था
जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी शनिवारी पुन्हा एकदा दोन बिगर काश्मिरींची हत्या केली. श्रीनगरमधील ईदगाह भागात दहशतवाद्यांनी एका बिहारी विपेत्याला गोळीबार करून ठार केले. त्याला गंभीर अवस्थेत श्रीनगरच्या एसएमएचएस रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. अरविंद कुमार साह असे ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तो मूळचा बिहारच्या बांका जिह्यातील आहे. अन्य घटनेत दहशतवाद्यांनी पुलवामामध्ये सगीर अहमद नावाच्या व्यक्तीवर गोळय़ा झाडल्या. यात त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. यूपीचा रहिवासी असलेला सगीर हा मेस्त्री म्हणून काम करत होता. 2 ऑक्टोबरपासून दहशतवाद्यांनी काश्मीरमध्ये 8 नागरिकांचा बळी घेतला आहे.
गेल्या 11 दिवसात सर्वसामान्य नागरिकांवर काश्मीरमध्ये तीन मोठे हल्ले करण्यात आले. 7 ऑक्टोबर रोजी शाळेतील शिक्षक आणि मुख्याध्यापकाची हत्या झाली होती. श्रीनगरमध्ये ईदगाह परिसरातील शाळेत घुसून दहशतवाद्यांनी दोन शिक्षकांची हत्या केली होती. त्यापूर्वी 5 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध फार्मासिस्ट मखनलाल बिंद्रू यांची श्रीनगरच्या इक्बाल पार्क परिसरात दहशतवाद्यांनी त्यांच्या मेडिकल स्टोअरमध्ये घुसून गोळय़ा घालून हत्या केली होती.
200 बिगर मुस्लिमांना ठार करण्याचे लक्ष्य
काश्मीरमध्ये 200 बिगरमुस्लीम लोक दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आहेत. जम्मू-काश्मीरमधील काश्मिरी पंडित आणि बिगर मुस्लिमांवर हल्ला करण्याचे मोठे षड्यंत्र पाकव्याप्त काश्मीरमध्ये (पीओके) रचले जात आहे. यासंदर्भात, नुकतीच पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआय आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये उपस्थित असलेल्या दहशतवाद्यांमध्ये एक गुप्त बैठक झाली. आयएसआय आणि दहशतवादी संघटनांमधील ही गुप्त बैठक 21 सप्टेंबर रोजी झाल्याचे अहवालात सांगण्यात आले आहे. भारतीय गुप्तचर संस्थांना आयएसआय आणि दहशतवादी संघटनांमधील गुप्त बैठकीशी संबंधित महत्त्वाची माहिती मिळाली आहे.