नवी दिल्ली / वृत्तसंस्था
स्थलांतरित काश्मीरी पंडित शिक्षिकेची जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्हय़ात दहशतवाद्यांनी हत्या केली आहे. रजनी बाला असे या शिक्षिकेचे नाव होते. त्या मूळच्या सांबा येथील होत्या. गोपालपोरा खेडय़ात त्या शिक्षिकेची नोकरी करत होत्या. तेथेच मंगळवारी सकाळी 10 च्या सुमारास त्यांची हत्या करण्यात आली. त्यांच्या निवासस्थानात घुसून दहशतवाद्यांनी त्यांच्यावर जवळून गोळय़ा झाडल्या.
त्यांच्या मारेकऱयांचा लवकरच शोध घेतला जाईल आणि त्यांना कंठस्नान घातले जाईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेच्या चौकशीचा आदेश देण्यात आला असून घटनास्थाची नाकेबंदी करण्यात आली आहे. त्यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी काश्मीरी पंडितांनी जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगर येथे रस्त्यावर येऊन निदर्शने केली. सरकारने काश्मीरी पंडितांच्या संरक्षणासाठी ठोस पावले उचलली पाहिजेत. पंडितांना लक्ष्य बनवून मारले जात आहे. सरकारने त्यांना पुरेसे संरक्षण पुरवावे, अशी मागणी बाला यांच्या नातेवाईकांनी केली आहे.
बाला यांच्या हत्येचा निषेध अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांनी केला आहे. नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी या हत्येचा निषेध केला तर पीडीपी नेत्या मेहबुबा मुफ्ती यांनी या हत्येला केंद्र सरकार जबाबदार असल्याचा आरोप केला. काश्मीरमध्ये शांतता निर्माण झाली आहे, असे खोटे दावे केंद्र सरकार करीत आहे. तथापि, निरपराध लोकांच्या हत्यांच्या संख्येत वाढ होत आहे, अशी टीका त्यांनी केली. सज्जाद लोन यांनीही हत्येचा निषेध केला.
राज्य भाजपची संतप्त प्रतिक्रिया जम्मू-काश्मीर प्रदेश भाजपचे प्रवक्ते अल्ताफ ठाकूर या हे भ्याड कृत्य असल्याची प्रतिक्रिया दिली. मे महिन्यातील ही काश्मीरी पंडितांची दुसरी हत्या आहे. काही दिवसांपूर्वी काश्मीरी पंडित समाजातील एक कर्मचारी राहुल पंडित यांची अशीच कार्यालयात घुसून हत्या करण्यात आली होती. नंतर तीन ऑफ डय़ूटी पोलिसांचीही हत्या झाली होती. त्याआधी काश्मीरमध्ये फेरीवाल्याचा व्यवसाय करणाऱया काही बिहारी नागरीकांना मारण्यात आले होते. त्यामुळे यापुढे केंद्र सरकारने सावधानता बाळगावी, असे मत व्यक्त होत आहे.